नगर – आष्टी ते नगर अशी रेल्वे सध्या सुरू आहे. त्या रेल्वे गाडीची दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. आता ही रेल्वे गाडी आष्टी- नगर- पुणे अशी पुढे सुरू करण्यासाठी तातडीने अधिकाऱ्यांनी चाचणी करावी, ही चाचणी यशस्वी झाली तर रेल्वे गाडीचा वेग व वेळ पाहून रेल्वे बोर्डाबरोबर चर्चा करून लगेच नगर-पुणे रेल्वे गाडी सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी केली.
आष्टी- नगर रेल्वेची दुसरी आजपासून सुरू करण्यात आली. मंत्री दानवे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही गाडी आष्टीकडे रवाना करण्यात आली. त्यापूर्वी जिल्ह्यातील रेल्वे विभागासंबंधित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री दानवे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, खासदार प्रितम मुंडे, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर, भानुदास बेरड, वसंत लोढा, सचिन पारखी, जिल्हाधिकारी उॉ. राजेंद्र भोसले याच्यासह रेल्वेचे मुुंबई व नगरचे अधिकारी उपस्थित होते.
दानवे म्हणाले की, नगर- पुणे रेल्वे गाडी सुरू करण्याची अनेक दिवसापासून मागणी आहे. सध्या आष्टी- नगर रेल्वे सुरू आहे. त्यातच आता त्या मार्गावर दुसरी तीच रेल्वेगाडी करणार आहे. सध्या सुरू असलेल्या आष्टी-नगर रेल्वे गाडीला अल्प प्रतिसाद आहे. केवळ 30 टक्के प्रवासी आहेत. असे असतांनाही दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. अर्थात बीड-परळी रेल्वे सुरू झाली की यात फरक पडेल. ज्या पद्धतीने आष्टी-नगर हे रेल्वे गाडी सुरू करण्यात आली. त्यानुसार आता पुढे ही रेल्वे पुण्याकडे मार्गस्थ करण्यात येईल. त्यादृष्टीने तातडीने चाचणी करण्यात येणार आहे. आष्टीहून नगरला येणारी ही रेल्वे पुढे पुण्याकडे मार्गस्थ होईल. त्यामुळे बीड व नगर जिल्ह्यातील पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
त्यादृष्टीने तातडीने नगर-पुणे रेल्वे मार्गावर रेल्वेची चाचणी करण्यात येईल. वेळ व वेग या दोन्ही गोष्टी जुळवून आल्यात तर पुणे रेल्वे सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. चाचणी यशस्वी झाली तर पुढे रेल्वे बोर्डात खासदार सुजय विखे व खासदार प्रितम मुंडे यांना बरोबर घेवून चर्चा करण्यात येईल. व नगर-पुणे नव्याने रेल्वेगाडी सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. असे ते म्हणाले. भूमिगत मार्गाचा प्रश्न देशभरात आहे. पावसाचे पाणी भूमिगत मार्गामध्ये साठत असल्याने तेथून प्रवास करणे अडचणीचे होत आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करीत आहे. रेल्वे उड्डाणपूल उभारण्यास रेल्वे तयार आहे.