छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांचा दावा
भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे साखर व मळी विक्रीबाबत केलेले आरोप हे वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असून त्या-त्या वेळच्या प्राप्त परिस्थितीचा विचार करून साखर व मळी विक्रीबाबत संचालक मंडळाने घेतलेला निर्णय योग्यच आहे, असा खुलासा कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिला आहे.
या वर्षीचा गळीत हंगाम सुरू करणेपूर्वी मशिनरी ओव्हरहॉलिंग व मेन्टेनन्सची कामे, ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा भरती करणे, केमिकल, बारदाना खरेदी, कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादीसाठी जवळपास 47 कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्याकरिता संचालक मंडळाने बॅंकांकडून रक्कम उपलब्ध करणेसाठी प्रयत्न केला व जिल्हा बॅंकेनेसुद्धा कारखान्यास जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केली आहे; परंतु आरबीआयच्या निर्बंधामुळे बॅंकेकडून एवढी मोठी रक्कम विनातारण उपलब्ध होऊ शकत नसलेने संचालक मंडळाने मळी व साखर आगाऊ विक्री करणेचा निर्णय घेतला आहे.
गेली 2 ते 3 महिन्यांपासून कारखाना ही रक्कम बिनव्याजी वापरत आहे. यामध्ये कारखान्याचा फायदाच झाला आहे. ही रक्कम बॅंकेकडून घेतली असती तर त्याकरिता 12 टक्के व्याज भरावे लागले असते व साखर व मळी विक्रीबाबतचा निर्णय घेतला नसता तर कारखान्याचा गळीत हंगाम चालू करणे अडचणीचे झाले असते. मागील दोन हंगामातही आपण तशा पद्धतीचे निर्णय घेतल्याने आपल्याला गळीत हंगाम घेता आले व उच्चांकी गाळप करता आले. साखर व मळीचे आता बाजारभाव वाढले असून साखर व मळीच्या आगाऊ विक्री केल्यामुळे कारखान्यास तोटा आला, असा आरोप करण्यात आला आहे.
शेवटी बाजारपेठेत चढ-उतार होत असतो.पाठीमागे जाचक हे संचालक मंडळाचे सभेस उपस्थित राहत होते. त्यावेळी हंगाम चालू करणेच्या दृष्टीने कारखान्यास पैशाची आवश्यकता होती व बॅंकेकडून पैसे उपलब्ध होत नसल्याने जाचक यांच्या संमतीने मळीची आगाऊ विक्री करणेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी कारखान्यास पैशाची उपलब्धता होत नसेल तर जेवढ्या पैशाची आवश्यकता आहे, तेवढ्या प्रमाणात मळीची आगाऊ विक्री करावी असे सूचित केले होते. तसेच साखरेचे दर वाढल्याचे कारण देऊन काही साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे करार मोडले असले तरी कारखान्यांनी प्रति क्विंटल रुपये 100 प्रमाणे ईएमडी घेऊन करार केले आहेत; परंतु आपले कारखान्याने प्रति क्विंटल रुपये 1100 प्रमाणे ईएमडी घेतली आहे.
1 लाख 35 हजार टन ऊसगाळप
सध्या कारखान्याचे गाळप सुरळीतपणे चालू असून आत्तापर्यंत 1 लाख 35 हजार 058 मे. टन उसाचे गाळप होऊन 1लाख 14 हजार 900 क्विंटल साखर उत्पादित झाली आहे. कारखान्याची दैनंदिन रिकव्हरी 9.38 टक्के व सरासरी रिकव्हरी 9.22 टक्के इतकी आहे. तेव्हा गाळप हंगाम सुरळीतपणे पार पाडणेसाठी कारखान्याचे सर्व सभासद, अधिकारी, कर्मचारी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, ऊस तोडणी मजूर यांचे चांगले सहकार्य मिळत आहे व येथून पुढचा गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पाडणेसाठी अशाच प्रकारचे सहकार्य सर्वांनी करावे व सभासदांनी आपलेच कारखान्यास ऊस गळितास देऊन सहकार्य करावे, अशी विनंती कारखान्याचे अध्यक्ष, प्रशांत काटे यांनी या वेळी केली.