कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून आणलेली माणसं चालतात, मग त्यांच्याशी आघाडी केली तर बिघडलं कुठं?
मुंबई : कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील पक्ष फोडून आणलेली माणसं तुम्हाला चालतात. मग मी त्या पक्षासोबत हात मिळवला तर बिघडले कुठे? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. आपण भाजपकडे निवडणुकीआधी जे ठरले होते तेवढेच मागितले होते. भाजप शब्दाला जागला असता तर मी मुख्यमंत्री पदावर दिसलो नसतो, असेही त्यांनी शिवसेनेच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर प्रथमच दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी विविध प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाने शब्द पाळला असता तर पुढच्या घडामोडी टळल्या असत्या. मी आकाशातले चांद-तारे मागितले नव्हते. लोकसभा निवडणुकीच्या आधी आमच्या वाटाघाटी झाल्या तेव्हा जे आमच्यात ठरले होते तेवढंच मागितले होते.
त्यांनी अशा पद्धतीने वचन मोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. शिवसैनिक मुख्यमंत्री पदावर बसवणार असे वचन मी शिवसेनाप्रमुखांना दिले आहे आणि त्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. शिवसेनाप्रमुखांनी आयुष्यात कधी सत्तेचं कोणतेही पद स्वीकारले नाही. माझीही तशी इच्छा नव्हती. पण अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही जबाबदारी स्वीकारावी लागल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हिंदुत्वाबाबत तडजोड नाही!
शिवसेना महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी लढण्याकरिता जन्माला आली. त्यानंतर देशातील हिंदूंवर गंडांतर येतंय असं शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आलं तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा अंगीकार केला. सालची पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्दयावर लढली व जिंकलीही. त्यानंतर भाजप बरोबर आला.
दोन समविचारी पक्ष हिंदुत्वाच्या मुद्दयावर एकत्र आले. मात्र आमच्या हिंदुत्वात वचन देणं आणि वचन पाळणं याला अपार महत्त्व आहे. वचन जर मोडलं जात असेल तर असं हिंदुत्व मी स्वीकारायला तयार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आम्ही हिंदुत्वावर आजही ठाम आहोत आणि राहाणार, त्यात तडजोड नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
विधानपरिषदेत जाणार !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याच सभागृहाचे सदस्य नसल्याने सहा महिन्यात त्यांना निवडून यावे लागणार आहे. ते विधानसभा निवडणूक लढवणार, की विधानपरिषदेत जाणार याबद्दल कुतूहल होते. याबद्दलच्या प्रश्नाला उत्तर देताना आपण परिषदेवर जाणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.
विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुक घ्यावी लागेल. लवकरच विधान परिषदेची निवडणूक येत आहे. कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मी तर छपरातून आलो आहे, असा मार्मिक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
सीमाप्रश्नात केंद्राची भूमिका पक्षपाती !
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाविषयी बोलताना महाराष्ट्रासाठी हुतात्म्यांनी सांडलेले रक्त मी वाया जाऊ देणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली. सीमावाद सोडवण्यासाठी काही कठोर पावले टाकावी लागतील. या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी दोन मंत्र्यांची नेमणूक केली आहे.
केंद्र सरकार हे राज्य सरकारचे पालक असते, केंद्राने निःपक्षपाती राहायला हवे. पण गेल्या पाच वर्षांत आश्चर्यकारकरीत्या केंद्र सरकार सातत्याने कर्नाटक सरकारची बाजू कोर्टात मांडत आहे हे संतापजनक असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.