लोकसभेत विरोधकांची सीएए, एनआरसीवरून निदर्शने
अधिर रंजन चौधरींनी सुनावले गोलीने लोकांची बोली बंद होऊ शकत नाही
नवी दिल्ली – लोकसभा सभागृहात आज कॉंग्रेस, द्रमुक आणि अन्य पक्षाच्या सदस्यांनी सीएए, एनआरसी व एनपीआरच्या विरोधात सभापतींच्या आसनापुढे जमून आंदोलन केले. यावेळी हातात फलक फडकवत त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत कामकाज रोखून धरण्याचाही प्रयत्न केला. यावेळी बोलताना कॉंग्रेसचे गट नेते अधिररंजन चौधरी म्हणाले की सरकार गोलीचा वापर करून लोकांची बोली बंद करू शकत नाही. केंद्रीय मंत्र्यांनी गोळ्या मारण्याची भाषा वापरली आहे अशी भाषा देशात चालू देणार नाही असा इशाराही यावेळी विरोधी सदस्यांनी सरकारला दिला.
आज सकाळी प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी सदस्य सभापतींच्या आसनापुढे जमले आणि त्यांनी हा गदारोळ सुरू केला. सभापती ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आंदोलक सदस्यांना शांत करून जागेवर बसण्याची वारंवार विनंती केली. पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे कामकाज सुरू होताच दहा मिनीटांनी कामकाज तहकुब करावे लागले. त्यानंतरही सभागृहात सदस्यांचा गदारोळ सुरूच राहिला. सीएए, एनपीआर व एनआरसीवरून आम्हाला आझादी हवी असल्याच्या घोषणा कॉंग्रेस सदस्यांनी दिल्या.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्यावेळी हे विषय आपण उपस्थित करू शकता असे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना सांगितले पण त्याकडेही त्यांनी दुर्लक्ष करीत गदारोळ सुरूच ठेवला. त्यानंतर शुन्य प्रहरात सभापतींनी अधिररंजन चौधरी यांना त्यांच्या मुद्द्यांवर बोलण्याची अनुमती दिली. यावेळी बोलताना चौधरी यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की सीएए विरोधी आंदोलकांवर गोळ्या झाडून त्यांना ठार मारण्याचा प्रकार देशात अनेक ठिकाणी घडला आहे. लोक हातात राष्ट्रध्वज घेऊन घटनेचे रक्षण करण्यासाठी शांततेने आंदोलन करीत असताना त्यांच्यावर निर्घृणपण गोळ्या झाडल्या जात आहेत.
भाजप सदस्यांना उद्देशून ते म्हणाले की तुम्ही बोगस हिंदु आहात, आम्हीच असली हिंदु आहोत असेही त्यांनी नमूद केले. या कामकाजाच्यावेळी विरोधी सदस्यांनी सभागृहात घटना वाचवा, देश वाचवा, भारत वाचवा अशा घोषणा देणारे फलक फडकावले होते. तुम्हाला घटना मजूबत करायची असेल तर सभागृहातील चर्चेत सहभागी व्हा असे आवाहन सभापतींनी यावेळी गदारोळ करणाऱ्या सदस्यांना केले