पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थीहित प्रथम, या उक्तीप्रमाणे कार्य करत अनेक प्रश्न तडीस लावले आहेत. महासंघाचे पदाधिकारी वेळेचा विचार न करता गरजवंतांना न्याय देण्यासाठी धडपडताना दिसतात. राज्यातील इतर संघटनांना महासंघाचे कार्य दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन ग्रामीण कथा लेखक बबन पोतदार यांनी केले.
महासंघाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला व निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते. इंदूकेअर फार्माचे चेअरमन डॉ. रामदास कुटे यांनी १५०० विद्यार्थी, शिक्षक पालकांच्या कल्पकतेला संधी दिल्याबद्दल महासंघाचे कौतुक केले. या वेळी व्यंकटेश चिरमुल्ला, नितीन ऊर्फ बबलू जाधव, नंदा माने, सुचेता पाताळे, नारायण शिंदे, जितेंद्र पायगुडे, ज्ञानेश्वर गायकवाड, विकास थिटे, संदीप सातपुते, रेवणनाथ पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी राजेंद्र साठे होते.
निबंध स्पर्धेतील गमतीजमती, निबंध कसा लिहावा, याबाबत बबन पोतदार यांनी मार्गदर्शन केले. या वेळी विजेते विद्यार्थी, शिक्षक व पालकांना गौरविण्यात आले. ज्या शाळांनी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सहभाग नोंदवला, अशा पस्तीस शाळांच्या मुख्याध्यापकांनाही सन्मानित करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख सोपान बंदावणे, सुदाम करंजावणे, शशिकांत किंद्रे, मारुती माळवदकर, संजय घोडके, उत्तम कांगुणे यांनी परिश्रम घेतले. परीक्षक म्हणून भरत सुरसे, अनुराधा दळवी, आयुब शेख, सुचेता साळवी यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन सोपान बंदावणे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर गायकवाड यांनी मानले.