श्रीकांत कात्रे
सातारा – सातारा व माढा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रचारात रंग भरू लागले आहेत. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. प्रचारामध्ये व्यक्तीगत टीकाटिपणी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील प्रमुख समस्या किंवा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने व लोकांना भेडसवणाऱया प्रश्नांचे उत्तर शोधण्याच्या आवश्यक मुद्द्यांचा समावेश प्रचारात दोन्ही बाजूच्या प्रमुख उमेदवारांकडून होत नाही. त्यामुळे निवडणुकीतील उमेदवारांचे जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे.
सातारा मतदारसंघात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर माढा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात संघर्ष आहे. माढा मतदारसंघात जिल्ह्यातील फलटण आणि माण हे दोन विधानसभा मतदारसंघ येतात. तर उर्वरित सातारा, वाई, कोरेगाव, कराड दक्षिण आणि उत्तर व पाटण हे सहा विधानसभा मतदारसंघ सातारा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत. या आठही मतदारसंघांमधून गेल्या अनेक वर्षांपासून लोकांचे रखडलेले प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्याशिवाय जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्यादृष्टीने आणखी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होण्याची गरज आहे.
निवडणुकीच्या रिंगणातील सर्वच उमेदवारांनाही हे प्रश्न माहिती आहेत. पण प्रचारात एकमेकाविरुद्ध चिखलफेक करण्याखेरीज काहीच होत नाही. त्यामुळे नुसत्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नकोत तर लोकांच्या प्रश्नांबद्दलही बोला, असे म्हणण्याची वेळ या उमेदवारांनी आणली आहे. सातारा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत. उदयनराजे १९९१ पासून तर शशिकांत शिंदे १९९७ पासून जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय आहेत. कदाचित तेव्हापासूनच्या प्रश्नांची जाणीव त्यांना असावी. आता तेचतेच प्रश्न पुन्हा चघळायचे का, अशा प्रश्न त्यांच्या मनात असू शकतो. पण तो असला तरी आता तरी प्रश्नांची उत्तरे सांगा असेच लोक म्हणू लागले आहेत. या प्रश्नांना प्रचारात कोणतेच स्थान नाही, हे लोकांचे केवळ दुर्दैव आहे, असेच म्हणावे लागेल. उदयनराजे सध्या राज्यसभेचे खासदार आहत. त्यापूर्वी चार वेळा ते लोकसभा सदस्य म्हणून केंद्रात काम करीत होते. राज्यातही आमदार, मंत्रिपदाची जबाबदारी त्यांनी पेलली आहे.
शशिकांत शिंदे सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. यापूर्वी ते जावळी आणि कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेचे सदस्य होते. कॅबिनेट मंत्रिपदापर्यंत ते पोहचले होते. या दोन्ही उमेदवारांचा हा अनुभव लक्षात घेता जिल्ह्याने आता विकासाची भरारी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत असतील तर त्यात चुकीचे काय आहे. मात्र, प्रचारामधून अजूनही त्यांची विकासाची भूमिका स्पष्ट होत नाही, हीच खंत आहे. आरोप- प्रत्यारोप करा; पण लोकांच्या प्रश्नांनाही उजाळा द्या, असे आता म्हणावे लागत आहे. उदयनराजे यांनी मनात आणले तर ते काहीही करु शकतात, इतके त्यांचे सरकार दरबारी आणि लोकांच्या मनातही स्थान आहे. शशिकांत शिंदे हेही एक आक्रमक नेतृत्त्व म्हणून राज्यात परिचित आहेत.
असे असूनही दोघांकडून विकासाचे मुद्देच प्रचारात नसतील तर या निवडणुकीला अर्थ तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. प्रचारासाठी शिल्लक दिवसांत जिल्ह्याच्या विकासाची भूमिका मांडूनही दोघांनीही विकासाच्या पूर्तीसाठी आग्रही राहण्याची अपेक्षा लोक व्यक्त करीत आहेत. माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक निंबाळकर पाच वर्षे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी पाणीप्रश्नासाठी प्रयत्न केले तरी अद्यापही त्यावर खुप काम करण्याची गरज आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी तुलनेत उशिरा जाहीर झाली तरी त्यांच्याकडून मतदारसंघातील प्रश्नांचा आणि विकासाचा मुद्दा प्रचारात असावा अशी अपेक्षा आहे. शैक्षणिक सुविधा, औद्योगिक विकास, इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, आयटी पार्क, शेतीमाल प्रक्रिया उद्योग, रोजगार स्वयंरोजगार, आरोग्य सुविधा, धरणे व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, पर्यटन विकास, दळणवळणाच्या सुविधा, क्रीडा, महिला सक्षमीकरण असे अनेक प्रश्न समोर उभे आहेत. या विषयांच्या व्हिजनवर प्रचारामधून भर हवा, अशी लोकांची अपेक्षा आहे. आरोप- प्रत्यारोप नेहमीचेच आहे. आता जरा लोकांच्या प्रश्नांकडे उमेदवारांनी लक्ष द्यायला हवे.
प्रचारात हवे या विषयांचे व्हिजन
-माण, खटाव तालुक्यांसह फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्यांचा काही भाग दुष्काळाने त्रस्त आहे. या तालुक्यांचा विकास पाण्याअभावी खुंटला आहे. हा प्रश्न काही नवा नाही. वर्षानुवर्षे याच प्रश्नावर राजकारण रंगले. गेल्या काही वर्षांत प्रयत्न झाले. मात्र, शेतकऱयांच्या बांधापर्यंत पाणी पोहचत नाही. तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही, हेही खरेच आहे. यावर्षी तर दुष्काळाचे चटके सोसणे कठीण झाले आहे. असे असतानाही या प्रश्नाबाबतची भूमिका प्रचारात दिसत नाही.
– औद्योगक विकासाचा प्रश्न आजही महत्त्वाचा आहे. इतर जिल्ह्यांची तुलना केली तर सातारा जिल्हा औद्योगिक विकासात खूपच मागे आहे. मोठे प्रकल्प या जिल्ह्यात येत नाहीत, आले नाहीत, ही वस्तुस्थिती दुर्लक्षून चालणार नाही. पाणी, वीज, रेल्वे, रस्ते, जागा अशा किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची क्षमता या जिल्ह्यात असूनही औद्योगिक विकास होत नाही. आयटीसारखा उद्योग इथे विकसित होऊ शकतो. शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग इथे प्रगती साधू शकतात. इंडस्ट्रिअल कॉरिडॉर माणमध्ये व्हावा की कोरेगावमध्ये यात वाद करण्यापेक्षा या कॉरिडॉरमधून विकासाविषयी भूमिका घेणे महत्वाचे ठरणार आहे.
– जिल्ह्यात युवकांचे प्रश्नही अनेक आहेत. शिक्षणासाठी आणि रोजागारासाठी तरुणांचे लोंढे जिल्ह्याबाहेर जात आहेत. त्यासाठी उच्च शिक्षणाच्या आणि रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी जिल्ह्यातच उपलब्ध झाल्या पाहिजेत, याविषयीची योजना प्रचारातून स्पष्ट व्हायला हवी. धरणग्रस्तांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागण्याची गरज आहे.
– जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध होणे आवश्यक आहे. पर्यटन विकासासाठीयोग्य नियोजनबद्द प्रयत्न हवेत.