इंदापूर – इंदापूर, बारामती भागातील द्राक्ष हंगाम जवळजवळ आटोपला असून बागायतदार आता खरड छाटणीनंतरच्या कामांमध्ये व्यस्त आहेत.
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये द्राक्ष वेलीची वाढ सतत होत असते. या भागातील द्राक्ष वेली सुप्त अवस्थेत जात नाहीत. त्यामुळे वरील राज्यातील द्राक्ष बागा वर्षातून दोन वेळा छाटाव्या लागतात. उन्हाळ्यामध्ये एकदा व हिवाळ्यामध्ये दुसर्यांदा, मार्च, एप्रिल महिन्यात केलेल्या छाटणीला खरड किंवा पायाभूत छाटणी असे म्हणतात.
तर हिवाळ्यातील छाटणीला फळ छाटणी असे म्हणतात. सध्य परिस्थितीत पायाभूत छाटणीच्या कामांनी गती घेतली असून पुढील हंगामासाठी उत्कृष्ट प्रतीचे घड निघण्यासाठी मालकाड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. छाटणी, काडी विरळणी, सबकेन करणे, शेंडा मारणे इत्यादी कामे प्रशिक्षित कामगारांकरवी केली जात आहेत.
दुष्काळी परिस्थिती व वाढत्या तापमानाला तोंड देण्यासाठी प्रत्येक बागायतदाराकडे शेततळे आहे, त्यामध्ये साठविलेले पाणी अडचणीच्या काळात वापरले जाते. बरेचसे बागायतदार बागेमधील पाण्याचा र्हास कमी करण्यासाठी उसाच्या पाचटाचा उपयोग आच्छादन म्हणून करतात.
अडचणींच्या गर्तेत सापडलेले द्राक्ष पिक आता हळूहळू उभारी घेऊ लागले आहे. कृषी विद्यापीठे, द्राक्ष संशोधन केंद्र, शास्त्रज्ञ, जाणकार मंडळी इत्यादींच्या प्रयत्नाने छाटणीच्या बदललेल्या वेळा, कृषीशास्त्राचा अचूक वापर, कमीत कमी किटकनाशके बुरशीनाशकांचा वापर इत्यादीमुळे उत्कृष्ट चवीची गोड रसाळ द्राक्ष तयार होऊ लागल्या आहेत. त्यामुळे बागायतदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
-राजेंद्र वाघमोडे, महात्मा फुले कृषी विज्ञान केंद्र