हभप लांडगे ः जागतिक मराठी राजभाषा दिनी राजगुरुनगर आगारात कार्यक्रम
राजगुरुनगर -मराठी भाषेच्या उपयोजनातून जास्तीत जास्त मौखिक व लिखित संवाद होण्यासाठी साहित्यव्यवहार आणि दैनंदिन व्यवहार यांची प्रयत्नपूर्वक सांगड घालण्याची गरज आहे. मराठी भाषेची उपयोजितता वाढली तर तिचा अधिक वापर वाढू शकेल, असे प्रतिपादन येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे सचिव हभप अनिलमहाराज लांडगे यांनी केले.
येथील एसटी महामंडळाच्या राजगुरूनगर आगाराच्या वतीने आयोजित जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर आगार व्यवस्थापक रमेश हांडे, स्थानकप्रमुख तुकाराम पवळे, किरण खुडे, कामगार संघटनेचे सचिव दत्तात्रय गभाले, मुरलीधर कोतवाल, कांताराम गभाले यांच्यासह आगारातील कर्मचारी प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लांडगे म्हणाले, जेवढ्या बोलीभाषेतील संधी इंग्रजीतून किंवा इतर भाषेतून उपलब्ध आहेत. त्याहीपेक्षा अधिक संधी मराठीतूनही उपलब्ध आहेत. त्यासाठी मराठी ज्ञानभाषा होण्याची गरज आहे. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथमहाराज आदी अठरापगड जातीच्या संतांनी ही मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. तीला सौंदर्याचा साज चढवला आहे. छत्रपती शिवरायांनी आपल्या अद्वितीय पराक्रमाबरोबरच मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी राज्यव्यवहार कोषाची निर्मिती केली.
प्रास्ताविकात आगार व्यवस्थापक रमेश हांडे म्हणाले, भाषेची सामाजिक जाणीव आणि अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. साधुसंतांची, वीरांची असलेल्या या भूमीने भाषा खूप समृद्ध केलेली आहे. यासाठीच कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी हा कार्यक्रम आयोजित केला जातो.
सूत्रसंचालन दिलीप चौधरी यांनी तर हिरामण दिघे यांनी आभार मानले. कार्यक्रमापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले वाहतूक नियंत्रक नागेश्वर वैरागर यांनी कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी रेखाटली होती. याप्रसंगी प्रवाशांचे सत्कार करण्यात आले. राजभाषा दिनानिमित्त प्रवाशांना पेढे वाटण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन रमेश तापकीर, महेश बिरदवडे, दशरथ आखाडे, भारत वाबळे, मनीषा सुतार, वर्षा बनकर, स्वाती बिरादार, सुनंदा कोकाटे, स्नेहा कातोरे यांनी केले.