नवी दिल्ली,-केंद्रीय राज्यमंत्री असणारे माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांचे एक वक्तव्य चीनच्या हाती कोलीत देणारे ठरले आहे. त्यावरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
चीनी कुरापतींमुळे काही महिन्यांपासून सीमेवर म्हणजेच प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) लगत तणावाची स्थिती आहे. अशात सिंह यांच्या वक्तव्यासंबंधीचे एक वृत्त प्रसिद्ध झाले आहे. भारताने चीनपेक्षाही अधिक वेळा एलएसी ओलांडल्याच्या घटना घडल्याचे सिंह यांनी म्हटल्याचे त्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.
तो धागा पकडून चीनकडून प्रतिक्रिया देण्यात आली. भारताकडून अनवधानाने चुकीची कबुली देण्यात आली. भारताकडून सातत्याने एलएसीचे उल्लंघन होत असल्याने तणावाची स्थिती निर्माण होते, असा कांगावा चीनकडून करण्यात आला. दरम्यान, राहुल यांनी ट्विटरवरून सिंह यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. भाजपचा एक मंत्री भारतविरोधी बाजू मांडण्यास चीनला मदत का करत आहे? संबंधित मंत्र्याला हटवले जावे. मंत्रिपदावरून न हटवले जाण्याची कृती प्रत्येक भारतीय जवानाचा अवमान करणारी ठरेल, असे राहुल यांनी म्हटले.