रेडा -शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 22 अर्ज दाखल झाले आहेत. या भरलेल्या अर्जामध्ये एकच अर्ज विरोधी गटाचा तर 21 अर्ज माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली दाखल करण्यात आलेले आहेत. जरी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संचलाक मंडळ बिनविरोध होऊ शकले नसले तरी संचालक मंडळ बिनविरोध निवडीची परंपरा कायम राखेल, असा विश्वास कार्यकर्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 13) अर्जांची छाननी असून विरोधी उमेदवार अर्ज मागे घेणार की 20 वर्षांनंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागणार, हे सोमवारी स्पष्ट होईल, अशी आशा आहे.
दाखल झालेल्या अर्जामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राजवर्धन हर्षवर्धन पाटील, प्रतापराव सर्जेराव पाटील, उदयसिंह विलासराव पाटील, प्रकाश शहाजी मोहिते, संजय तुळशीराम बोडके, हरिदास मारुती घोगरे, दादासाहेब उत्तम घोगरे, मच्छिंद्र संताराम वीर, दत्तात्रेय रामचंद्र शिर्के, लालासाहेब देविदास पवार, कृष्णाजी दशरथ यादव, बबनराव आनंता देवकर, भागवत भानुदास गोरे, दत्तू यशवंत सव्वाशे, उदयसिंह विलासराव पाटील, चंद्रकांत रामचंद्र भोसले, संगिता दत्तात्रय पोळ, जबीन कमाल जामदार, कांतीलाल शिवाजी झगडे, विलास रामचंद्र वाघमोडे, सुजाता जालिंदर गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यातील सुजाता जालिंदर गायकवाड यांनी अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण कारखान्याचे संचालक मंडळ बिनविरोध होऊ शकले नाही;मात्र नीरा भीमा कारखाना विरोध केला जाईल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
हर्षवर्धन पाटलांचे चिरंजीव राजकारणात
भाजपचे नेते तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव युवानेते राजवर्धन पाटील यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदासाठी त्यांनी शुक्रवारी (दि. 10) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
दरम्यान, कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार असून, राजवर्धन पाटील हे संचालकपदी बिनविरोध निवडून आल्याची घोषणा होणे बाकी आहे. राजवर्धन पाटील हे उच्चशिक्षित असून त्यांनी लंडन येथे पदवी घेतलेली आहे. उत्कृष्ट संघटन, वक्तृत्व, जनतेच्या प्रश्नांची असलेली जाण तसेच जनतेमध्ये मिसळण्याचा स्वभाव यामुळे राजवर्धन पाटील यांच्या विषयी युवक वर्गात उत्साही वातावरण निर्माण झालेले आहे.