पुणे -केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला, नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाले. निवडणूक आयोगाने “दूध का दूध पाणी का पाणी’ केले आहे. जे खोटे बोलत होते त्यांना सत्य कोणाच्या बाजूला आहे हे समजले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे शहा यांच्या भाषणापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 20 वर्षातील कार्याचा आढावा घेणाऱ्या “मोदी ऽ 20′ या मराठी अनुवादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार प्रकाश जावडेकर, पंकजा मुंडे, माधव भंडारी, प्रदेश महासचिव मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, उमा खापरे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, राहुल कुल, भिमराव तापकीर आदी उपस्थित होते.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिलेला निर्णय हा खूप मोठा आहे. खोट्याच्या आधारावर काही चालत नसते हे यातून स्पष्ट होते. विधानसभा निवडणुकीत ते भाजपबरोबर युतीमध्ये लढले. मोंदींचा मोठा फोटो लावला. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मानले. आमच्यासोबत निवडणूक लढले. मात्र विजय मिळताच सत्तेसाठी विरोधकांसोबत गेले. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारालाही धोका दिला आहे. त्यामुळे आज दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झाले, असे शहा यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना धोका देवून मुख्यमंत्री बनून चालत नाही असे म्हणत शहा यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. निवडणकीत यश-अपयश येत असते. धोका देणाऱ्यांना मात्र धडा शिकविलाच पाहिजे. आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व 48 जागा युतीच जिंकेल असा निर्धार करावा, असे आवाहन शहा यांनी कार्यकर्त्यांना केले. यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र परिश्रमही घेतले पाहिजेत, असा सल्लाही शहा यांनी दिला आहे.
“महाराष्ट्रात लोकांच्या मनातले सरकार स्थापन झालेले आहे. लोकशाहीत बहुमताला महत्व असते. त्यामुळे निवडणूक आयोगाने चांगला निर्णय दिला आहे. जे खरे आहे ते खरेच आहे. मी खोटे बोलत नाही व दिलेला शब्द पाळतो,’ असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.