मुंबई – केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे याच्या गटाला दिले. आयोगाच्या या निर्णयामुळे आता ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. आयोगाने आपल्या निर्णयात 2018ची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीला धरून नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पण ही कार्यकारिणी लोकशाही पद्धतीला धरुनच झाल्याचा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.
यासंबंधीत एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओत सभागृहात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी विविध पदांच्या घोषणाही करत असल्याचे दिसत आहे. यामध्ये लीलाधर डाके, गजानन किर्तीकर, दिवाकर रावते, मनोहर जोशी आदी ज्येष्ठ नेते दिसतात.
यासोबत अनेक ज्येष्ठ नेते भाषण करतानाही दिसत आहेत. यावेळी खासदार गजानन किर्तीकर यांनी मांडलेल्या ठरावाला सर्वांनी हात उंचावून मान्यता दिसल्याचे स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओतून सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत गंभीर आरोप केले आहेत.
अरविंद सावंत म्हणाले, देशाचा सध्या अमृतकाल सुरु आहे की विषकाल हे आता ठरवावे लागणार आहे. देशाच्या सर्वोच्च घटनेवरच निवडणूक आयोगाने घाव घातला आहे. तसेच आम्ही आमच्या कार्यकारिणी निवडीचे पत्र 4 एप्रिल 2014 ला निवडणूक आयोगाकडे सादर केले असल्याचे त्यांनी सांगितले.