देशातील करोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणाखाली येत असतानाच तिसऱ्या लाटेची चर्चा मात्र जोर धरू लागली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात एक श्वेतपत्रिका प्रसिद्ध करून त्यामध्ये तिसऱ्या लाटेबाबत सरकारने सावध राहावे, असा इशारा दिला आहे. करोना विषाणूची झपाट्याने बदलण्याची आणि औषधांना प्रतिकार करण्याची वाढती क्षमता लक्षात घेऊन सरकारने तिसरा लाटेसाठी स्वतःला सुसज्ज आणि सक्षम करावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी या श्वेतपत्रिकेत केली आहे.
गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये विविध वैद्यकीय तज्ज्ञ आणि काही वेळा राजकीय पक्षांचे नेतेही तिसऱ्या लाटेसाठी सर्वांनी तयार राहावे अशा प्रकारची विधाने करत आहेत. अर्थात, राहुल गांधी यांनी जी पक्षाच्या वतीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे त्यामागे कोणत्या प्रकारचे राजकारण नाही हे मान्य करावे लागेल. कारण, संपूर्ण अभ्यास करून ही श्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली असून दुसऱ्या लाटेच्या कालावधीमध्ये देशात मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याने तिसरी लाट येणार असेल, तर सरकारने बळींची संख्या नियंत्रणात राहील यासाठी काळजी घ्यावी. यासाठीच या श्वेतपत्रिकेत काही गोष्टी सुचविण्यात आल्या आहेत, हे महत्त्वाचे आहे.
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये देशात आलेल्या या दोन लाटा आणि काही तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्यांच्या सूचना घेऊन हा दस्तऐवज तयार करण्यात आल्याचा दावाही कॉंग्रेसने केला आहे. त्यामुळे केवळ त्यामधील राजकारण न बघता सरकारने या दस्तऐवजाची गंभीर दखल घेऊन तिसऱ्या लाटेसाठी सरकारने काय तयारी केली आहे त्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना देण्याची गरज आहे. केवळ विरोधी पक्षनेत्यांनी किंवा त्यातही राहुल गांधी यांनी काही सूचना केल्या म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका सरकारने घ्यायला नको. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत सरकारने अधिकृत माहिती सर्वसामान्यांना देण्याची गरज आहे.
ही तिसरी लाट खूप मोठी असेल आणि त्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होईल अशा प्रकारच्या अनेक बातम्या सध्या सोशल माध्यमांवर फिरत आहेत. त्याच प्रकारे या तिसऱ्या लाटेचा मोठा परिणाम लहान मुलांवर होणार असल्याच्याही बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत विनाकारण घबराट निर्माण होण्याची परिस्थिती असल्याने सरकारला याबाबत खरा काय तो खुलासा करावाच लागेल. गेल्या काही दिवसांमध्ये भारतातील विविध राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातही सर्व व्यवहार खुले झाल्यानंतर लोक ज्या प्रकारे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसू लागले आहेत ते पाहता तिसरी लाट खरंच फारशी लांब नाही, असेच म्हणावेसे वाटते. कारण अजूनही करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी जे मूलभूत नियम आहेत त्यांचे पालन सर्वसामान्य जनता गांभीर्याने आणि मनापासून करत आहे, असे वाटत नाही. साहजिकच काही दिवस व्यवहार बंद ठेवल्यानंतर पुन्हा एकदा व्यवहार सुरू केल्यावर लोक अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येणार असतील तर तिसरी, चौथी काय शंभरावी लाटसुद्धा येऊ शकते हे वास्तव नाकारून चालणार नाही.
रुग्णांची संख्या वाढायला लागली की सर्व व्यवहार बंद करायचे आणि लोकांच्या हालचालीवर नियंत्रण ठेवायचे आणि रुग्णांची संख्या कमी झाली की परत सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू करायचे अशा प्रकारची गोष्ट किती काळ चालू ठेवणार, याचा विचार आता करावाच लागेल. सर्व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवणे अर्थव्यवस्थेला आणि समाजव्यवस्थेला परवडणारे नसले तरी हे व्यवहार सुरू करण्याला परवानगी देऊन पुन्हा एकदा जर आपण करोना लाटेमध्ये वाहून जाणार असू तर त्याचा कोणालाच फायदा होणार नाही, ही गोष्टही लक्षात घ्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे करोना लसीकरणाची मोहीम सरकारला वेगाने आणि गांभीर्याने राबवावी लागेल.
जगातील ज्या देशांमध्ये लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, त्या देशांमध्ये अशा रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली असून तेथे कोणत्या प्रकारची लाट भविष्यात येण्याची शक्यता नाही अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे भारतानेही आता लसीकरणाला जास्तीत जास्त महत्त्व देण्याची गरज आहे. 21 जून रोजी “आंतरराष्ट्रीय योगदिना’चे निमित्त साधून भारतात 80 लाखपेक्षा जास्त लोकांना एकाच दिवसात लसीकरण करण्यात आले, हा एक जागतिक विक्रम असला तरी हाच वेग आणि हाच उत्साह आगामी कालावधीत कायम राहिला तर सर्वसामान्यांपर्यंत करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. पहिल्या लाटेच्या कालावधीमध्ये सर्वच गोष्टी नवीन असल्यामुळे काय करावे काय करू नये, हे कळत नव्हते. पण दुसऱ्या लाटेमध्ये सर्व गोष्टींची माहिती असूनही केवळ निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यामुळे मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली.
आता खरोखरच तिसरी लाट येणार असेल, तर त्या लाटेचा कोणताही भयावह परिणाम सर्वसामान्य जनतेवर होणार नाही याची काळजी सरकारला आतापासूनच घ्यावी लागेल. सूचना कोण करते आहे, याला महत्त्व न देता त्या सूचना महत्त्वाच्या असतील तर त्यांचा स्वीकार करून त्या अंमलात आणण्याचा मोठेपणा सरकारला आता दाखवावा लागेल. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये या दोन लाटांचा मोठा अनुभव सरकारच्या गाठीशी असल्याने त्याच्या आधारे सरकारला तिसऱ्या संभाव्य लाटेला तोंड देण्याची तयारी करावी लागेल. एकीकडे एकाच वेळी लसीकरणाची मोहीम वेगाने राबवत असतानाच दुसरीकडे संभाव्य लाटेला तोंड देण्याची तयारी सक्षम पद्धतीने केली तर या तिसऱ्या लाटेमध्ये कमीत कमी नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व व्यवहार ठप्प असल्याने अर्थव्यवस्थेचे आणि समाजव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तिसऱ्या लाटेमध्ये जर अशाच प्रकारे सर्व व्यवहार दीर्घकाळ बंद झाले, तर अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडून जाईल हे लक्षात घेता सरकारला सर्व बाजूंनी विचार करूनच तिसऱ्या लाटेला तोंड देण्याची तयारी करावी लागणार आहे, हे निश्चित. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या परिस्थिती बऱ्यापैकी चांगली असल्याने सरकारने आताच तिसऱ्या लाटेची खरी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. कारण सोशल माध्यमांच्या निमित्ताने चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचत असल्याने गैरसमज आणि घबराट वाढत आहे.