नीरा – पुरंदर तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गाव तसेच सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथील दऱ्याखोऱ्यांमध्ये आता बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
गेल्या 15 दिवसांत बिबट्याची पाळीव जनावरांवर हल्ला होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यमुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मागील 15 दिवसांत पिंगोरीतील शिंदेनगर परिसरात बिबट्याने दोन शेळी व एका वासराचा फडशा पाडला आहे. वनविभागाचे अधिकारी जयश्री जाधव, वाय. जे. पाचर्णे, बाळासाहेब गोलांडे यांनी पिंगोरी येथे भेट दिली. यावेळी पोलीस पाटील राहुल शिंदे, पल्लवी भोसले, धनंजय शिंदे, जीवन शिंदे, श्रीरंग शिंदे यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी वनविभाच्यावतीने बिबट्याच्या वर्तनाबाबात माहिती देऊन लोकांमध्ये पसरलेली बिबट्याची दहशत कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, वनविभागाच्या या सल्ल्याने ग्रामस्थ समाधानी नाहीत.
शेतामध्ये काम करीत असताना अनेक ठिकाणी महिला किंवा पुरुष एकटेच काम करत असतात. खुरपणी, पाणी देणे अशा वेळी वाकून किंवा बसून काम केले जाते.तसेच जनावरांना चारा देण्यासाठी डोंगर दऱ्यात एकट्याने जावे लागते. मग अशावेळी बिबट्याने हल्ला केला तर करायचे काय? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.