पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मुळा-मुठा नदी तसेच शहरातील तलावांत फोफावणारी जलपर्णी नष्ट करण्यासाठी महापालिकेकडून पाषणा तलावाच्या काही भागात बायो ड्रेन्झाइम या रसायनाचा वापर प्रयोगिक तत्वावर करण्यात आला होता. अवघ्या चार दिवसांत जलपर्णी सुकली होती, या रसायनाचे कोणतेही दुष्परिणाम झाले नसल्याचे समोर आल्याने बायो ड्रेन्झाइम इतरत्र वापर करण्यास योग्य आहे की अयोग्य याबाबत पालिकेने प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे विचारणा केली होती.
मात्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाने याबाबत तपासणी करणारी यंत्रणा आपल्याकडे नसल्याचे महापालिकेस कळविले आहे. त्यामुळे पालिकेने आता निरीकडे (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था) बायो ड्रेन्झाइमची तपासणी करून याचा वापर जलपर्णीवर केल्यास पर्यावरणास नुकसान होऊ शकते का, याचा अहवाल देण्याची विनंती केली आहे. त्यानंतरच याचा वापर करण्याबाबत प्रशासन पुढील निर्णय घेणार आहे.
नदीपात्र अखेर मोकळे…
मुंढवा, केशवनगर भागात मागील महिन्यांत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली होती. नदीपात्रात जवळपास तीन ते चार किलोमीटर परिसरात ही जलपर्णी पसरली होती. पालिकेकडून १५ दिवसांपासून जलपर्णी काढण्याचे काम करण्यात येत होते.
सलग २० दिवस सुमारे ३० कर्मचारी, १० ते १२ जेसीबी आणि ५ स्पायडर मशिनच्या साह्याने सर्व जलपर्णी काढण्यात आली आहे. मात्र, भविष्यात ती पुन्हा वाढण्याचा धोका असल्याने पालिकेकडून आता मोठ्या प्रमाणात बायो ड्रेन्झाइमचा वापर करण्याची शक्यता आहे, यासाठीच निरी संस्थेकडून तपासणी अहवाल मागविला आहे.