इतिहासात प्रथमच : करोनामुळे देवदेवताही क्वारंटाइन
एम. डी. पाखरे
आळंदी – देवदेवताही करोना महामारीच्या विळख्यात आली आहेत. करोनामुळे संपूर्ण मानवजात हताश, हतबल झाली. स्वतः विलगीकरणात गेली. त्याचबरोबर आपापल्या देवदेवतांनाही त्यांना विलगीकरणात ठेवावे लागले. देशाच्या इतिहासात प्रथमच एवढे दिवस “देऊळ बंद’ ठेवण्यात आली असल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे.
खेड तालुक्यात श्रीक्षेत्र भीमाशंकर, आळंदीचे श्री संत ज्ञानेश्वर महाराज व निमगाव दावडीचा, कडधेचा श्री खंडोबा, कनेसरची यमाई देवी आदी मोठी तीर्थस्थळे आहेत. तेथे दररोज लाखो भक्त भेट देतात. त्यायोगे मंदिरांच्या फंडपेटीत करोडोंच्या संख्येने निधी जमा होत असतो. त्यातचबरोबर तालुक्यात छोटी-मोठी अशी असंख्य मंदिरे आहेत जी सध्या बंद असल्याने त्यांचे हजारो-करोडोंचे नुकसान झालेले आहे. एवढेच नव्हे तर या मंदिरांवर अवलंबून असलेल्या अन्य कित्येक व्यावसायिकांनाही लाखोंचा फटका बसला आहे. या भक्तांद्वारे फंडपेटीत टाकण्यात येणारा निधी हा प्रत्येकी रोज सरासरी एक लाख रुपये तरी खात्रीने असतो. यावरून गत महिन्याभरातील या छोट्या-मोठ्या मंदिरांचे प्रत्येकी किमान 50 हजार ते 1 लाख रुपर्यांचे नुकसान झालेले आहे. तर श्रीक्षेत्र भीमाशंकर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, खंडोबा, यमाई देवी मंदिर देवसंस्थानांना 20 ते 80 लाखांचा फटका बसला आहे. त्याशिवाय या मंदिरांवर अवलंबून असलेले व्यावसायिक म्हणजे, फूल विक्रेते, खण-नारळ-उदबत्ती आदी ओटी साहित्य विकणारे, देवदेवतांच्या मूर्ती-दोरे-हळद-पिंजर-चंदन यासारखे अन्य साहित्य विकणारे, परिसरात हॉटेल-खानावळ चालविणारे, चणे-खाजे विकणारे, यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यात्रौत्सव रद्द
तालुक्यातील अनेक गावांमधील ग्रामदैवतांचे जानेवारी ते मे महिन्यात जत्रोत्सव भरतात. त्यात एक दिवसांपासून पाच दिवसांपर्यंत हा जत्रा उत्सव सुरू असतो. या दिवसांत गावाला जत्रेचे स्वरुप प्राप्त होते त्यामुळे जत्रेच्या दरदिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, यंदा मार्च महिन्याच्या मध्यापासून लॉकडाऊन सुरू असल्याने ही संपूर्ण उलाढाल ठप्प झाली असून हे लॉकडाऊन 17 मे पर्यंतजरी वाढले असले तरी पुढची स्थिती सांगता येणार नसल्याने यंदा तालुक्यात यात्रा होणारच नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आषाढी वारीवरही सावट
लाखो वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारीवरही यंदा करोनाचे सावट घोंगवत आहे. जरी जून महिन्यात आळंदीतून ही वारी पंढरपूरकडे प्रस्थान करते. मात्र यंदा ही वारी होणार की नाही याबाबत उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या आषाढी वारीमुळे आळंदी लाखो भाविक दाखल होत असतात त्यामुळे करोडो रुपयांचा व्यवहार या काळात होतो; मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर जनसमूदाय एकत्र न येणे हे सगळ्यांच्या दृष्टिने हिताचे असल्याने वारीबाबत शासन काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण वारकरी समाजाचे लक्ष लागले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर श्रीक्षेत्र अलंकापुरी येथील दरमहा देणगी रूपातून दानपेटी जमा होणारी रक्कमही सुमारे 50 लाख रुपयांच्या आसपास असून, दीड महिन्यात सुमारे 75 लाख रुपयांनी बुडाली आहे. तर मंदिरातील विकासकामे ठप्प असून ती कामे आता लॉकडाऊन उघडल्याशिवाय करणे शक्य नाही.
– ऍड. विकास ढगे पाटील, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवसंस्थान