Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंसह समस्त मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झालं आहे. आतंरवाली सराटीतून ते आज दि. 20 जानेवारी रोजी सकाळी निघाले. यावेळी मुंबईला निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसंच, ते भावूक आणि आक्रमही झाल्याचं पाहण्यास मिळालं.
‘प्राण गेला तरीही आता मागे हटणार नाही. मराठा समाजाने सरकारला सात महिने वेळ दिला आहे. तरीही आरक्षण मिळालेलं नाही, त्यामुळे मुंबईला गेल्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. सात दिवसांमध्ये आम्ही मुंबईला पोहचणार,’ असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
गावातून मुंबईच्या दिशेना जाताना ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जात आहे. मनोज जरांगे यांचा मोर्चा जालन्याच्या शहागड गावात पोहोचला तेव्हा अतिशय भावूक क्षण बघायला मिळाला. मनोज जरांगे यांचं संपूर्ण कुटुंब जरांगेंच्या भेटीसाठी आलं होतं. मनोज जरांगे यांच्या पत्नी, तीन मुली आणि मुलगा जरांगेंना कवटाळत होते.
सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते. यावेळी जरांगे स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होते. जरांगे यांच्या पत्नी यावेळी ढसाढसा रडत होत्या. जरांगेंच्या पत्नींनी त्यांना ओवाळलं. त्यांच्यासोबत तीन मुली होत्या. या मुलीदेखील आपल्या वडिलांना बिलगत होत्या. यावेळी संपूर्ण कुटुंबियांचा अश्रूंचा बांध फुटला होता.
‘माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही’ – मनोज जरांगे
दरम्यान, यावेळी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. माझ्या छातीवर गोळ्या पडल्या तरी मागे हटणार नाही. माझं शरीर मला उपोषणामुळे साथ देत नाहीये. पण मी असो किंवा नसो मराठ्यांची एकजूट मोडू नका.आपल्याला आरक्षण घ्यायचं आहे.
आमचं आंदोलन मुंबईत पोहचल्यावर कोट्यवधी मराठे मुंबईत दिसणार आहेत. राज्यभर आम्ही आमच्या तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये लढणार आहोत. ही आरपारची लढाई आहे कुणी घरी राहू नका अशी माझी मराठा बांधवांना विनंती आहे.’ अशी भावना मनोज जरांगे यांनी यावेळी व्यक्त केली.