Manoj Jarange Patil – मुंबईत होणाऱ्या उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांसह जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून आज सकाळी निघाले. यावेळी जरांगे यांच्यासोबत अनेक मराठा बांधव देखील मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. अशात आमदार बच्चू कडू देखील मराठा आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी सामील झाल्याचे पाहायला मिळाले.
आम्ही कुठंतरी कमी पडलो अशी स्पष्ट कबुली यावेळी बच्चू कडू यांनी दिली. जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सरकारला सूचना केल्या. सरकार अजूनही सकारात्मक आहे. सरकारने नोंदी शोधल्या आहेत.आणखी थोड्या वेगात सरकारने हालचाल केली तर मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळेल. असं आमदार बच्चू कडू म्हणाले. माध्यमाशी बोलताना त्यांनी मराठा आरक्षणाबाबत मत व्यक्त केलं.
जरांगे यांनी उपोषण करू नये असं मला वाटत त्यांच्या आंदोलनामुळे आज खूप नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे सरकारने काहीच केलं नाही असं म्हणता येणार नाही. त्यांनी अधिक समजून घेऊन याला यश कस मिळवून देता येईल हे पाहिलं पाहिजे असं देखील कडू यावेळी म्हणाले.
सरकार म्हणून माझी भूमिका संपली, मी आता या आंदोलनामध्ये सरकारच्यावतीने नाही तर आंदोलक म्हणून जात आहे. असं देखील कडू यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारच्यावतीने जरांगे यांच्याशी बातचीत करणारे बच्चू कडू देखील स्वतः मराठा आंदोलनात सामील झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.