पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केलेली आहे. ही शिक्षक पदभरती पारदर्शी पद्धतीने करण्यात येत आहे. सन २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शिक्षक पदभरती पुर्ण करण्याचा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे.
शिक्षक पदभरती ही शासनाच्या प्रचलित तरतुदीनुसार करण्यात येत आहे. पात्र अभियोग्यताधारकाने पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह अशा दोन प्रकारा पैकी कोणत्याही एका प्रकाराचे प्राधान्यक्रम लॉक केले असतील तर उमेदवार पदभरतीसाठी त्या त्या लॉक केलेल्या प्राधान्यक्रमासाठी विचारात घेतला जाणार आहे.
काही अपरिहार्य कारणास्तव पदभरती लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास प्रचलित कार्यपद्धतीनुसार ती पुढे पूर्ण करण्यात येईल. यास्तव पात्र अभियोग्यताधारकांनी याबाबत अनावश्यक चिंता करू नये, असेही मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षक पदभरतो विविध टप्यांमध्ये होत आहे. सध्या १६ ऑक्टोबर २०२३ ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये पोर्टलवर आलेल्या जाहिरातीची कार्यवाही करण्यात येत आहे. दुसऱ्या टप्यामध्ये येणाऱ्या जाहिरातींवरील कार्यवाही भविष्यात करण्यात येईल. पहिल्या टप्यामध्ये ज्या उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद केल्यामुळे,
स्वप्रमाणपत्र अपूर्ण ठेवल्यामुळे/मुदतीत स्वप्रमाणपत्र प्रमाणित न केल्यामुळे अशा विविध प्रकारच्या कारणांमुळे या सध्याच्या पदभरती प्रक्रियेत सहभागी होता येत नाही, अशा अभियोग्यताधारकांना नव्याने येणाऱ्या जाहिरातीच्या दुसऱ्या टप्यासाठी स्वप्रमाणपत्र पूर्ण, दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार आहे.
पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना
काही अभियोग्यताधारक शिक्षक पदभरतीबाबत समाजमाध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची चुकीची माहिती पसरवत आहेत. पात्र अभियोग्यताधारकांनी अशा चुकीच्या माहितीकडे दुर्लक्ष करावे.
समाजमाध्यमांवर चुकीची माहिती, स्वतःचे चुकीचे मत प्रदर्शित करुन पात्र अभियोग्यताधारकांमध्ये प्रक्षोभक, संभ्रम निर्माण करणारे, चिथावणी देणारे, उमेदवारांमध्ये नैराश्याची भावना निर्माण करणाऱ्या व त्यांचे समर्थन करत असलेल्यांविरुद्ध पोलीस विभागास निगराणी ठेवण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडुन देण्यात आलेल्या आहेत.