सी. पी. मोहंती : राष्ट्रीय युद्धस्मारक येथे शहीद जवानांना मानवंदना
पुणे – “दक्षिण मुख्यालयाच्या अधिपत्याखाली भारतीय लष्कराच्या तुकडीने 1971 साली विविध मोहिमांमध्ये मिळविलेले यश हे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे. आजही देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी मुख्यालय सज्ज आहे, असा विश्वास दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी. पी. मोहंती यांनी व्यक्त केला.
भारतीय लष्कराने 1971 साली पाकिस्तानविरोधात लढलेल्या लढाईला 16 डिसेंबर रोजी 49 वर्षे पूर्ण झाली. याच दिवशी पाकिस्तानला आपला पराभव पत्करत 93,000 सैनिकांसह शरणागती पत्करावी लागली. तर याच युद्धामुळे बांग्लादेशची निर्मिती झाली. देशाच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही सीमांवर हे युद्ध लढले गेले.
या युद्धादरम्यान दक्षिण मुख्यालयाच्या अधिपत्याखाली भारतीय लष्कराच्या सैनिकांनी लोंगेवाला आणि परबत अली या ठिकाणी लढलेली लढाई आणि पाकिस्तानातील चाचरो शहरातील लुट हे भारतीय लष्कराच्या इतिहासातील अविस्मरणीय मोहिमा आहेत. या मोहिमांचे यश हे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असून, या युद्धात सहभागी असलेल्या आणि यादरम्यान आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व युद्धवीरांना मुख्यालयातर्फे श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी दक्षिण मुख्यालयातर्फे पुण्यातील राष्ट्रीय युद्धस्मारक येथे आयोजित कार्यक्रमात 1971 च्या युद्धातील शहीद जवानांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यालयाचे उप-प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. एस. आहुजा यांनी पुष्पचक्र अर्पण करत शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली. सैन्यदलातील सेवारत आणि निवृत्त सैन्याधिकाऱ्यांनीही याप्रसंगी शहीदांना श्रद्धांजली अर्पण केली.