कवठे – शेंदुरजणे, ता. वाई हे गाव राजकीयदृष्ट्या जागरुक असून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजले जाते. त्यामुळे लक्ष्मणराव पाटील आणि मी स्वतः या गावातील नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन कार्यकर्त्यांची भक्कम फळी उभी केली. हे गाव तसे खूप चांगले आहे.
या गावात करोनाचे एकूण 54 रुग्ण सापडल्याची खंत वाटते. कार्यकर्त्यांचा निष्काळजीपणा आणि करोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला येथील नागरिकांनी सहकार्य न केल्यानेच गावात करोनाने थैमान घातले आहे, असे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी केले.
करोनासंबंधी आढावा बैठक आ. मकरंद पाटील यांनी वाईतील शासकीय विश्रामगृहात नुकतीच घेतली. प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार रणजित भोसले, वाईचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव उपस्थित होते. तीन हजार लोकसंख्येच्या शेंदुरजणे येथे 54 बाधित आढळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आ. पाटील यांना दिली होती. त्यानंतर आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांसमवेत काल (दि. 2) शेंदुरजणेला भेट दिली.
ते म्हणाले, महसूल प्रशासन, पोलीस, आरोग्य विभागाला नागरिकांनी सहकार्य न केल्याने गावात करोनाने थैमान घातले आहे. गावातून करोना हद्दपार करण्यासाठी ग्रामरक्षक समिती, तलाठी, ग्रामसेवक, मंडलाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत तर दुसऱ्या बाजूला या गंभीर स्थितीतही नागरिक एकमेकांवर शाब्दिक हल्ले करत आहेत.
त्यामुळे पोलीस बळाच्या जोरावर गावावर नियंत्रण ठेवायची वेळ यावी, हे दुर्दैवी आहे. गावात उपाययोजना राबविण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक असताना प्रशासनाने घालून दिलेले नियम धुडकावले जात आहेत; परंतु अजूनही वेळ गेली नसून कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गाव करोनामुक्त करण्यासाठी काम करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ग्रामसेवक व तलाठी यांनी पोलिसांच्या मदतीने कारवाई करावी.