पुणे, ता. 12 – येरवडा विभागातील नागपूर चाळ वसाहत भागातील गलिच्छ वस्ती निर्मलून योजनेची कार्यवाही शासकीय स्तरावरून बारगळली असे म्हणावयास हरकत नाही. आता ना. मोहन धारिया यांनीच दिल्ली महापालिकेने बांधलेल्या अशा वसाहतीचा आराखडा एक महिन्यात महाराष्ट्र शासनापुढे आणावा त्यावर आम्ही विचार करू अशी चर्चा मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या “वर्षा’ बंगल्यावर झाली आणि मूळची योजना सफाईने मुख्यमंत्र्यांनी गुंडाळली, असे वृत्त आहे.
नवी योजना त्वरित यावी
चर्चेत नवी योजना यावी असे ठरल्यावर ती त्वरित यावी अशी मागणी महापौरांचे शिष्टमंडळाने केली. नवी योजना मंजूर होऊन पुढील दोन वर्षांत घरांची कामे सुरू होतील किंवा नाही याबद्दल आपण साशंक आहोत, असाही अभिप्राय त्यांनी व्यक्त केला.
सरकारने कच्च्या मालाचा पुरवठा न केल्यास उपाहारगृहे बंद पडतील
पुणे – खाद्यपेय विक्रेत्यांना सरकारने कच्च्या मालाचा आवश्यक पुरवठा जर केला नाही तर उपाहारगृहे बंद ठेवण्याची पाळी येईल, असे आज चारुदत्त सरपोतदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. गेले 3 महिने सरकारकडून मालाचा पुरवठा अत्यंत अनियमितपणे होत आहे म्हणून खाद्यपेय विक्रेत्यांना खुल्या बाजारात भरमसाठ किंमत देऊन माल खरेदी करावा लागत आहे. असे असूनही खाद्यपदार्थांचे दर वाढविलेले नाहीत, असे सांगण्यात आले. आज पुण्यात सुमारे 30,000 लोक असे आहेत की, त्यांना रोज उपाहारगृहे अथवा खानावळीवरच अवलंबून राहावे लागते. शिवाय दिवाळीसारख्या सुट्टीत आणखी अनेक लोक पुण्यात येतात, तेही यावरच अवलंबून असतात, असे निळूभाऊ लिमये यांनी सांगितले.