या कामक्रोधलोभां । माजीं जीवें जो होय उभा ।
तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे ।। 431 ।।
श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा
संत ज्ञानेश्वर महाराजांनी श्री ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात काम, क्रोध, लोभ यांचे उदाहरण देऊन त्यातून दुःखच मिळत असल्याचे सांगितले आहे. ज्याच्या शरीरात काम, क्रोध, लोभ भरलेले आहेत तो दुःखाचा धनी होतो. पुराणांमध्ये, शास्त्रांमध्ये तसेच सर्वच संतांनी काम क्रोध, लोभ यांपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
हे तीन शब्द मनुष्याचा नाश करतात. या तिघांना शरीराच्या बाहेर काढून “रामकृष्णहरी’ या नामाला हृदयात जागा द्यावी. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र जपावा सर्वकाळ ।। उठता, बसता कोणतेही काम करताना रामकृष्णहरी विठ्ठल केशवा या नामाचा जप करावा.
जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, काम क्रोध लोभ निमाले ठाईची । अवघी आनंदाची सृष्टी झाली ।। आपल्या शरीरातून काम, क्रोध, लोभ यांना काढून टाकताच आपल्याला सर्व सृष्टी आनंदमय झालेली दिसेल.