मुंबई – गेल्या अनेक तीमाहीमध्ये पुरवठा परिस्थिती बिघडल्यामुळे वाहन क्षेत्रावर बराच परिणाम झाला आहे. टाटा मोटर्सच्या उत्पादन आणि विक्रीवरही याचा परिणाम झाला आहे. मात्र जुलैनंतर या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.
टाटा मोटर्सच्या 77 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चंद्रशेखरन म्हणाले की, टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगली मागणी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये जागतिक पातळीवरील पुरवठा साखळीवर परिणाम झाला असल्यामुळे विविध सुटे भाग मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
आता काही प्रमाणात या अडचणी कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पुढील सहा महिन्यात कंपनीचे उत्पादन आणि विक्री वाढण्यास मदत होणार आहे. सेमी कंडक्टरच्या तुटवड्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी झाला आहे. त्याचबरोबर इतर कच्च्या मालाच्या किमती स्थिर होऊ लागल्या आहेत. दीर्घपलल्यात कंपनीचे उत्पादन आणि विक्री वाढण्यासाठी कंपनीने बऱ्याच उपाययोजना केल्या होत्या. त्याचे सकारात्मक परिणाम होतानी दिसून येत आहेत.
इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही टाटा समूहाने आता आघाडी घेतली असून विविध घटकातील कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. त्यानुसार टाटा मोटर्स समूहाच्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 2045 मध्ये शून्यावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोना, रशिया- युक्रेन युद्ध, महागाई इत्यादी कारणामुळे जागतिक पातळीवर भयंकर घटना घडूनही भारतीय अर्थव्यवस्था यातून सुरक्षितपणे बाहेर पडत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.