पुणे – पियाजियो व्हेईकल्स ही कंपनी भारतामध्ये आगामी काळामध्ये पर्यावरण पूरक वाहनावर भर देणार आहे. केंद्र सरकारने पर्यावरण पूरक इंधन निर्मिती आणि वापराला चालना दिल्यामुळे आम्ही अशा प्रकारची वाहने विकसित करीत आहोत, असे या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डिएगो ग्रॅफी यांनी सांगितले.
कमी इंधनावर जास्त मायलेज देणाऱ्या आपे एनएक्सटी प्लस या वाहन प्रकारातील पेट्रोल, सीएनजी आणि एलपीजीवरील तीन वाहने आज या कंपनीने बाजारपेठेत आणली. या वाहनाचे पूर्ण तंत्रज्ञान भारतामध्ये विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आम्ही राबविली आहे.
सीएनजीवरील वाहन एक किलो सीएनजीमध्ये तब्बल 50 किलोमीटर चालते असा दावा त्यांनी केला. भारत सरकार सीएनजी आणि एलपीजीचा पुरवठा वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांची मागणी आगामी काळात वाढेल. त्यामुळे पर्यावरणाची कमी हानी होईल असे ते म्हणाले.
कंपनीचे रिटेल फायनान्सचे कार्यकारी उपाध्यक्ष सजू नायर म्हणाले, व्यापक संशोधन व मोठ्या प्रमाणात ग्राहक अभिप्रायानंतर आपे एनएक्सटी+ विकसित करण्यात आली आहे. इंधन खर्चांमध्ये वाढ होत असताना आम्हाला खर्चाची बचत करण्यासोबत उच्च मायलेजप्रती आमच्या ग्राहकांच्या गरजा समजल्या आणि म्हणून आपे एनएक्सटी+ ची निर्मिती करण्यात आली. शक्तिशाली पिक-अप आणि अपवादात्मक ड्रायव्हिंग अनुभवासाठी 3-व्हॉल्व्ह तंत्रज्ञान इंजिन डिझाइन करण्यात आले आहे.