नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील स्थिती गुरूवारी आणीबाणीच्या काळातील स्थितीपेक्षाही वाईट होती, असे टीकास्त्र माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी सोडले. निदर्शकांवरील कारवाई, ठप्प करण्यात आलेली इंटरनेट सेवा आणि बंद करण्यात आलेले मेट्रो स्थानके यांचा संदर्भ त्यांनी दिला.
वादग्रस्त कायद्याच्या विरोधात माकप आणि इतर डाव्या पक्षांनी आज देशव्यापी निदर्शनांची हाक दिली. निदर्शनांमध्ये सहभागी झालेले येचुरी येथे पत्रकारांशी बोलत होते. लोकशाहीचा गळा घोटू न देण्याचा निर्धार तरुणांनी केला असल्याचे निदर्शनांनी दाखवून दिले. तशी निदर्शने यापुढेही चालूच राहतील, असे येचुरी यांनी म्हटले.
भाकपचे सरचिटणीस डी.राजा यांनी भाजपबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टीकेचे लक्ष्य केले. सरदार पटेलांच्या विचारसरणीशी विसंगत कार्य भाजप करत आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व असू शकत नाही. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक म्हणजे मोदी आणि शहांनी राज्यघटनेचा केलेला अघोषित विध्वंसच आहे, अशी टीका राजा यांनी केली.
सध्याची निदर्शने हिंदू-मुस्लिम मुद्द्यावरून नाहीत. भारत धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून कायम राहावा यासाठीची ती निदर्शने आहेत, अशी भूमिकाही डाव्या पक्षांच्या नेत्यांनी मांडली.