नागपूर : पाहुनी सौख्य माझे….देवेंद्र तोही लाजे…
शांती सदा विराजे….या झोपडीत माझ्या…
संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या काव्याचा हवाला देत महाराष्ट्र विकास आघाडी हे गोरगरीबांचे सरकार आहे, शेतकऱ्यांचे सरकार आहे. आमचे सरकार हे रिक्षावाल्यांचे सरकार आहे, पण बुलेट ट्रेनवाल्यांचे सरकार नाही. विरोधकांना जसा शेतकऱ्यांबद्दल कळवळा आहे तसा आम्हालाही आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला फटकारले. आमचे सरकार हे त्रिशंकू सरकार नाही. तर आम्ही मनाने एकत्र आलो आहोत, काम करण्यासाठी एकत्र आलो आहेत आणि सत्ताधारी पक्षाच्या बाकांकडे हात दाखवत हे माझे वैभव आहे, असे सांगताच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचे बाके वाजवत अभिनंदन केले.
विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान भाजपाने केलेल्या टिकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सडेतोड प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, होय, हे गोरगरीबांचं सरकार आहे. या गरीबाला बुलेट ट्रेन परवडणार नाही, त्याला रिक्षातूनच जावं लागेल, असे म्हणताच सत्ताधाऱ्यांनी बाके वाजवून मुख्यमंत्र्यांना दाद दिली. हे तीन पक्षांचे सरकार असून ते किमान समान कार्यक्रमावर पूर्ण पाच वर्षे टिकणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तो कार्यक्रमच राज्यपालांच्या अभिभाषणातून दिसत असून त्या आधारे हे सरकार काम करील. आमच्या सरकारने बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं, असा टोला लगावतानाच काही वेळा आपण भरपूर बोलतो आणि मग पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होतं. त्यापेक्षा कमी बोलायचं आणि जास्त काम करावं ही आपल्या साधूसंतांची शिकवण आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत उद्धव ठाकरे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनाचे सार सांगितले.
किटली पकडणारी फडकी गरम झाली
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी आपल्या भाषणात “चहापेक्षा किटली गरम’… असा उल्लेख केला होता. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, या सरकारविषयी कुणीतरी म्हणाले, की चहापेक्षा किटली गरम. चहापेक्षा किटली गरम हा शब्दप्रयोग आहेच. चहा कोण, चहावाला कोण, किटली कोण. चहापेक्षा किटली गरम होऊ शकते, कारण गरम-गरम चहा त्यात ओतला जातो. पण किटली पुसणारी फडकीही गरम व्हायला लागली. ही फडकी गरम झाली, त्याची फडकी गरम व्हायला लागली तर काय करायचं, अशा शब्दांत ठाकरे यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारच
माझा महाराष्ट्र हा आधार या भारताचा… असे सेनापती बापट म्हणाले होते. हे तत्व पाळण्यासाठी एकमेकांमधील गैरसमज देशहित आणि राज्याच्या हिताच्या आड नको येऊ देऊया. आम्ही दिलेली वचनं पाळणार. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं असेल, त्यांना चिंतामुक्त करायचं असेल तर ते आम्ही करणार. आमचं सरकार हे केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा दिली.