पिंपरी -महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) शासकीय सेवेत विलीनीकरण व्हावे, या प्रमुख मागणीसाठी वल्लभनगर आगारासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामध्ये वल्लभनगर आगारातील 294 कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. एसटी महामंडळ आर्थिक तोट्यात गेल्याने कर्मचाऱ्यांचे पगार वारंवार थकत आहेत.
त्यामुळे हे पूर्ण महामंडळच सरकारी सेवेत विलिन करावे, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी 28 ऑक्टोंबर रोजी चर्चा केली. त्यात महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता वाढविण्याच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. मात्र, महामंडळाचे सरकारी सेवेत विलीनीकरण करावे, या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत.
कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज (मंगळवारी) विविध संस्था-संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. भाजपाचे प्रदेश सचिव अमित गोरखे, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले, वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, लहुजी शक्ती सेनेचे सोमनाथ कांबळे, राजु आवळे, विष्णु कसबे संपतराव ओहळ, शांताराम खुडे, आर. डी. रामटेके यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठींबा दिला.