मुंबई : राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व प्रलंबित मागण्यांच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे अस्त्र उगारले आहे. तर, हे आंदोलन थांबावे व एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे सरकारकडून आवाहन केले जात आहे. मात्र, एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने देखील कडक भूमिका घेतली आहे. सरकारकडून राज्यभरातील तब्बल ३७६ एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यभरातील १६ विभागातील ४५ आगारामधील ३७६ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच, “ एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात न्यायालयाने आदेश दिला होता आणि हा संप बेकायदेशीर ठरवला होता. त्यानंतर देखील काही संघटनांनी, एसटीच्या संपाची नोटीस दिली होती आणि म्हणून आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो.
उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर आहे, असे जाहीर केलेले आहे. हे जाहीर केल्याच्या नंतर देखील, हा संप सुरू असल्याचे काल आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, उच्च न्यायालयाने सूचना केली की याबाबत तुम्ही अवमान याचिका दाखल करू शकतात. म्हणून एसटी महामंडळ अवमान याचिका दाखल करत आहे. ” असे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडून सांगण्यात आले आहे.