बारामती बाजारात 62.571 टन कोषाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार
रेशीम कोष उत्पादकांना किलोमागे 50 रुपयांचे अनुदान
पुणे – राज्यात रेशीम कोष खरेदी बाजारपेठेला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद आहे. त्यानुसार राज्यातील तीन बाजारपेठांच्या माध्यमातून 10 कोटी 64 लाख रुपये किंमतीच्या 323.522 टन कोषाची खरेदी झाली आहे. रेशीम कोष उत्पादकांना किलोमागे 50 रुपयांचे अनुदान मिळत असल्यानेदेखील शासकीय बाजारातच कोष विक्रीवर उत्पादकांचा भर वाढला आहे. तर बारामती बाजारात 62.571 टन कोषाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले.
राज्यात रेशीम कोष विक्रीचा पर्याय उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कर्नाटकातील रामनगर बाजारातच विक्रीसाठी जावे लागत होते. राज्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भाषेचा मोठा अडसर होत असल्याने त्या माध्यमातून त्यांच्या लुटीचे प्रकारही वाढीस लागले होते. त्यामुळे राज्यात कोष विक्रीचा पर्याय असावा, अशी मागणी होत होती. रेशीम संचालनालयाने त्याची दखल घेत पहिल्या टप्प्यात बारामती, जालना, पूर्णा (परभणी) अशा तीन ठिकाणी रेशीम कोष बाजार उभारले आहेत.
बाजारात गेल्या आठ महिन्यांत कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये जालना बाजारात 3 हजार 77 शेतकऱ्यांकडून 247 टन कोष विक्री करण्यात आली. या माध्यमातून 8 कोटी 12 लाख 40 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पूर्णा रेशीम बाजारात 159 शेतकऱ्यांनी 13.081 टन कोष विकून 48.98 लाख रुपये कमविले. बारामती बाजारात 62.571 टन कोषाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार झाले. राज्यातील एकूण खरेदी 323.522 टन तर, 10 कोटी 64 लाख 65 हजार रुपयांची उलाढाल आहे. राज्यात तीनही रेशीम बाजारांना रेशीम कोष उत्पादकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता आठवडाभरापूर्वी पाचोड (पैठण) येथे रेशीम कोष बाजाराची सुरुवात केली आहे.
राज्याच्या काही भागांत रेशीम कोषाला किलोमागे अनुदान देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. त्याच धोरणाचा अवलंब महाराष्ट्रात केला असून 50 रुपये किलोमागे अनुदान दिले जात आहे. त्यामुळेदेखील स्थानिक बाजारात रेशीम कोष विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल वाढीस लागला आहे. या व्यवहारात पारदर्शकता राहावी, याकरिता खरेदी विक्रीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे.