प्रशांत जाधव
सातारा – जिल्ह्यात व शहरात सुरू असलेली अवैध व्यवसायांविरुद्धची मोहीम काही दिवसांपासून पूर्णत: थंडावल्याने पुन्हा एकदा सातारा शहराच्या सर्वच भागात अवैध दारू विक्री, जुगार, मटक्यासह अन्य अवैध धंदेवाले सक्रिय झाले असून प्रभावी पोलीस कारवाईची गरज आहे.
सातारा शहरातील महत्वाचा भाग असलेल्या राजवाडा परिसरातील स्व. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाच्या बेसमेंटमध्ये तर अवैध धंद्यांचे आगार सुरू आहे. परिणामी त्याठिकाणी असलेल्या व्यापाऱ्यांची तसेच तिथे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या सुरू असलेले हे धंदे पाहून हा परिसर दोन नंबरवाल्यांना शाहूपुरी पोलिसांनी आंदण दिला की काय, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. शाहूपुरी पोलिसांची ही कुचकामी भूमिका नक्की कोणाच्या हिताची आहे याबाबत खुद्द पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी तपास करण्याची गरज आहे.
शहरात गेले काही दिवस तोंडदेखले बंद असलेले अवैध धंदे पुन्हा एकदा जोमात सक्रिय झाले आहेत. मध्यतंरी जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस, तसेच एसपींच्या खास पथकाने कारवाईची धडक मोहीम राबवली होती. त्यामुळे शहरातील अवैध व्यावसायिकांनी दाखवण्यासाठी तरी गाशा गुंडाळला होता. मात्र, गेल्या काही दिवसांत पोलिसांवर इतर कामाचा (?) ताण वाढल्याने त्यांचे कारवाईकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. राजवाडा परिसर शहरातील नागरिकांसाठी परिवारासह फिरण्यासाठी हक्काचे ठिकाण असून तेथे नव्याने अनेक कार्यालये होत आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी वर्दळ याठिकाणी असते. अभयसिंहराजे भोसले व्यापारी संकुलाचे बेसमेंट, कस्तुरबा गांधी रूग्णालयाच्या आवारात अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे. ही बाब सामान्य नागरिकांच्या लक्षात येत असेल तर शाहूपुरी पोलीसांच्या लक्षात का येत नाही. पोलिसांचे लक्ष खरच नाही की, त्यांच्या डोळ्यावर व्यवहाराची पट्टी लावण्यात आली आहे, याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.
अशा पोलिसांचा फायदा काय?
सातारा शहराचा क्राईम दर वाढत असल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्याची निर्मिती 2014 मध्ये करण्यात आली. त्यानंतर ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यात या पोलीस ठाण्याला अपेक्षित यश आले नाही. पोलीस ठाण्यातीलच काही भानगडबाजांच्या गंमतीमुळे निर्माण झालेले वाद रफादफा करण्यात वरिष्ठांचा वेळ गेला. परिणामी अवैध धंद्यांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली अन् नंतर तर हेच धंदेवाले पोलिसांच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी पण अवैध धंदेवाले ठाण मांडणार असतील अन् त्याचा त्रास सामान्य लोकांना होणार असेल तर अशा पोलिसांचा जनतेला फायदा तरी काय, असाप्रश्न विचारला जात आहे.