काही वर्षांपूर्वी उत्तमोत्तम नाटके रंगमंचावर येत होती. वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर असे मातब्बर नाटककार कितीतरी वेगळ्या विषयांवर नाटके लिहीत होते. श्रीराम लागू, काशीनाथ घाणेकर, सुलभा देशपांडे, रीमा लागू, शांता जोग, वसंतराव देशपांडे असे ताकदीचे कलाकार नाटकातील व्यक्तिमत्त्वांना अजरामर करीत होते. नटसम्राट, कट्यार काळजात घुसली, हिमालयाची सावली, रायगडाला जेव्हा जाग येते, विषवृक्षाची छाया, अश्रूंची झाली फुले, ती फुलराणी, शांतता कोर्ट चालू आहे… किती नावे घ्यावीत! ही सारी नाटके कधीही विसरता न येण्याजोगी! नाट्यक्षेत्रातील प्रवासात मैलाचा दगड ठरलेली!
कट्यार काळजात घुसली या नाटकाचे अलीकडेच पुनरुज्जीवन झाले व त्या नाटकाचे प्रयोग धडाक्याने झाले. त्यानंतर चित्रपटही चांगला चालला. नटसम्राट नाटकावर चित्रपट निघाला. नटसम्राट, ती फुलराणी, अश्रूंची झाली फुले या नाटकांमधले जबरदस्त संवाद आजही आवडीने पेश केले जातात. आरण्यक हे रत्नाकर मतकरींचे 1974 सालचे नाटक पुन्हा 2018मध्ये म्हणजे पंचेचाळीस वर्षांनंतर पुन्हा रंगमंचावर आणले गेले. विशेष हे की, त्यातले रवी पटवर्धन, प्रतिभा मतकरी असे काही कलाकार आधीच्या नाटकातही होते.
अलीकडेच “हिमालयाची सावली’ या एका वेगळ्या नाटकाचे नव्याने प्रयोग सुरू झाले आहेत. जवळजवळ चाळीस वर्षांनंतर हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आले आहे. वसंत कानेटकरांच्या या नाटकात त्या वेळी श्रीराम लागू, शांता जोग, अशोक सराफ असे ख्यातनाम नट होते. अलिकडेच शरद पोंक्षे हे मोठ्या आजारातून उठले आहेत. ते हॉस्पिटलमध्ये असतानाच “हिमालयाची सावली’ हे नाटक त्यांनी करावे असा प्रस्ताव त्यांच्याकडे आला. ते बरे होऊन, नाटकाच्या तालमी करून नाटक उभे राहीपर्यंत बराच काळ जाणार होता. तरीही निर्मात्यांनी त्यासाठी थांबण्याची तयारी दाखवली आणि शरद पोंक्षे ह्यांनीच या नाटकातील नानासाहेबांची भूमिका साकारली. शृजा प्रभुदेसाई या नाटकात बयोचं काम करतात. राजेश देशपांडे यांचे दिग्दर्शन आहे.
नानासाहेबांनी समाजासाठी आयुष्य वाहून घेतलेले. स्वतःसाठी, कुटुंबासाठी ते जगतच नाहीत. मात्र घरातल्या बाईला संसार सांभाळायचा असतो. दोन सावत्र मुले. त्यांनाही या बयोने प्रेमाने सांभाळले. पण नानासाहेबांची तत्त्वनिष्ठा एवढी जाज्वल्य की, परदेशात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी नाव सुचवताना आपला मुलगा सगळ्या दृष्टीनी पात्र असूनही केवळ तो आपला मुलगा आहे म्हणून ते त्याचं नाव सुचवत नाही. नानासाहेबांची पत्नी बयो हीही अशी जिद्दी की, ती आकाशपाताळ एक करून पैसे जमवते व मुलाला त्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षणासाठी परदेशात पाठवतेच. अशी ही जुगलबंदी नाटकभर चालू राहते. नानासाहेब दिवस उजाडताच संस्थेच्या कामासाठी बाहेर पडतात. वणवण फिरतात, देणग्या गोळा करतात, विधवा परित्यक्ता महिलांसाठी आश्रम उभा करतात. पदरमोड करून, स्वतःचे विम्याचे पैसे खर्च करून आश्रमाचा खर्च भागवतात. बयो कोंड्याचा मांडा करून, कधी पतीशी भांडत फाटक्या संसाराला टाके घालत राहते. बयो बोलून मोकळी होणारी तर नानासाहेब अबोल. बयोचा स्वभाव फणसासारखा. बाहेरून काटे आणि आतून गोड गरे. नवऱ्यासाठी, मुलांसाठी तिचा जीव तिळतिळ तुटतो. नानासाहेब कधी बोलत नाहीत पण शेवटी स्वतःच्याच मनासारखे करतात. त्यांच्या कष्टांना सीमा नाही. पायात कधी चपला आहेत, कधी नाहीत. तथाकथित लोकांचे हल्ले पचवतात. पण कशाचाही बोभाटा न करता आपल्या विहित कार्यावरची अविचल निष्ठा ते ढळू देत नाहीत.
नाटकात नानासाहेबांच्या वाट्याला फारच थोडे संवाद. जे काही बोलायचे ते डोळ्यातून बोलायचे. पण चित्रपटात किंवा टीव्ही मालिकेत क्लोजअप असल्याने डोळ्यातला प्रत्येक भाव टिपणारा कॅमेरा इथे नसतो. म्हणजे प्रेक्षकांपर्यंत भावना पोचवायच्या त्या आवाजातून आणि देहबोलीतून! ती कामगिरी शरद पोंक्षे उत्तमरित्या पार पाडतात. ते शरद पोंक्षे वाटतच नाहीत. ते समाजाचा कळवळा असलेले, ध्येयनिष्ठ ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वच वाटतात. असा एखादा संस्थाप्रमुख असू शकतो हे आजच्या काळात खरे वाटणार नाही. नाटकात नानासाहेब म्हणतात, “आयुष्यात एक तर बायकोमुलांचा तरी संसार करता येतो किंवा समाजकार्याचा तरी प्रपंच करता येतो. दोन्हीची एकत्र मोट बांधणारा माझ्यासारखा फक्त पराभूतच होतो.’ हे वाक्य म्हणजे या नाटकाचे मर्म आहे. शृजा प्रभुदेसाई रंगमंचावर नाहीत, असे फार क्वचित होते. त्यांनी हे नाटक उत्तमरित्या पेलले आहे. बयोचे प्रेम, तिचा मनमोकळा स्वभाव हे सारे त्यांच्या अभिनयातून प्रकट होते. यथावकाश संस्थेमध्ये हितसंबंधी लोकांची चलती सुरू होते. हाडाची काडं करून उभारलेल्या संस्थेत नानासाहेबांना एकटे टाकले जाते. मग मात्र नवऱ्यावर वैतागणारी बयो पदर खोचून त्यांच्या बाजूनी उभी राहते. त्यांना न्याय मिळावा म्हणून भांडते. आपल्या नवऱ्याचा त्याग, उच्च ध्येयावरची निष्ठा ती पुरती जाणून आहे. “हिमालयाची सावली’ हे नाटक आपल्याला आज पहायला मिळणे ही मोठीच संधी आहे. ती सोडता कामा नये.
माधुरी तळवलकर