परफेक्ट फिटनेसचे ध्येय साध्य करण्यासाठी आज आपणा सर्वांचीच अचानकपणे एकच धावपळ उडालेली दिसत आहे. खरेतर आता फिटनेसची व्याख्या बदलून गेली आहे आणि फिट राहणे म्हणजे फक्त बारीक असणे नव्हे तर सर्व दृष्टीने तंदुरुस्त असणे ही गोष्ट सर्वमान्य झाली आहे. खरोखरंच झिरो फिगर गाठली म्हणजे आपण स्वास्थ्याची परिसीमा गाठली असे मानायचे का? सोशल मीडियावरून आरोग्य आणि फिटनेस या विषयावरील चर्चा सतत जोरदार सुरु असते, पण या चर्चेमुळे प्रत्येकजण झिरो फिगर मिळविण्याच्या शर्यतीमध्ये ओढला जात आहे. निरोगी असणे म्हणजे मॅरेथॉन धावणे किंवा केवळ शरीराने फिट दिसणे नव्हे. तर मग आरोग्य किंवा निरोगी असणे म्हणजे नेमके काय?
‘केवळ आजार किंवा अशक्तपणाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर संपूर्ण, शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य,’ अशा शब्दांमध्ये जागतिक आरोग्य परिषदेने आरोग्यवान अर्थात निरोगी असण्याची व्याख्या केली आहे. आरोग्य/निरोगी असण्याची ही व्याख्या झटपट डाएट, खूप जास्त व्यायाम करणे किंवा झिरो फिगर मिळवणे यावर भर देत नाही. या व्याख्येनुसार आरोग्याचा खरा अर्थ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे असा आहे. पण अलीकडच्या काळामध्ये मानसिक आरोग्य आणि सामाजिक आरोग्य यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. उलट फिट आणि बारीक दिसण्याचा ताण लोकांच्या आरोग्यावर परिणाम करू लागला आहे.
वैद्यकीय तपासण्यांच्या रिपोर्टसमध्ये थोडे वरखाली झालेले काही आकडे दुरुस्त करण्यापासून ते वयाच्या 40 व्या वर्षी स्वत:ला मॅरेथॉनसाठी सज्ज करण्यापर्यंत, ते अगदी आदर्श शरीरयष्टी मिळविण्यासाठी चित्रविचित्र डाएट्स करण्यापर्यंतचे अनेक प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत. पण हे प्रकार आपल्याला खरोखरंच आरोग्याच्या किंवा निरोगी असण्याच्या दिशेने घेऊन जाणारे आहेत का?
सर्वात आधी एक सर्वात मुलभूत गोष्ट समजून घ्यायला हवी. आपल्या शरीरासाठी आणि त्याला निरोगी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज आहे हे समजून घेतल्याशिवायच आपण जीम, हेल्थ क्लब्ज आणि असे कितीतरी मार्ग स्वीकारतो. वजनाच्या काट्यावरील आकडा खाली उतरलेला पाहण्यासाठी होणारी घालमेलच मूळात मनावरचा ताण आणखी वाढवते, तरीही निरोगी बनण्याच्या दिशेने आपला प्रवास सुरूच राहतो. पण आपल्याला खरोखरीच असे आरोग्य हवे आहे का?
नेहमी 8 वाजल्यानंतर उठणाऱ्या व्यक्तीला पहाटे पाच वाजता उठून ताजेतवाने वाटणे शक्य नाही. अशावेळी त्या व्यक्तीच्या मनाची आणि शरीराची स्थिती काय होत असेल याची कल्पना करून पहा. वजनातले ते अधिकचे किलो कमी करून दाखवण्याची हमी देणाऱ्या अननुभवी आहारतज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार केलेल्या क्रॅश डाएटमुळेही आपल्या शरीराचे असेच हाल होतात. शिवाय असे करताना आपण अजाणतेपणी मानसिक ताणही वाढवून घेत असतो आणि त्यामुळे संतुलित आरोग्य राखले जात नाही. आरोग्य प्रतिनिधींना आपल्या ग्राहकांच्या आरोग्यस्थितीची कल्पना नसते त्यामुळे त्यांना चुकीच्या प्रमाणात व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे स्नायू फाटणे/लचक भरणे, लिगामेन्ट्सना दुखापत होणे इत्यादी समस्या तयार होतात.
व्यायाम करणे आणि श्रमणे यात फार थोडा फरक असतो. वर्कआऊट करणाऱ्या किंवा मॅरेथॉन धावणाऱ्या अनेक जणांना विशिष्ट व्यायाम करण्याचे आणि सप्लिमेंट्स घेण्याचे सल्ले दिले जातात, ज्यांचा खरेतर त्यांच्या शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. आकर्षक दावे करणारी औषधे कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेणे हे सुद्धा आजकाल सर्रास पहायला मिळत आहे. याला औषधी द्रव्यांचे व्यसन म्हटल्यास वावगे ठरू नये.
तथाकथित आहार नियमनांबद्दल किंवा हेल्दी डाएट्सबद्दल बोलायचे झाले तर केवळ प्रथिने किंवा फक्त फळावर भर देणाच्या डाएटचे किंवा किटो डाएटसारख्या एखाद्या काटेकोरपणे पाळायच्या आहारपद्धतीचे काही परिणाम निश्चितच दिसतील पण ते फार काळ टिकणार नाहीत. असली डाएट्स संपल्यानंतर त्यांचे मना-शरीरावर होणारे परिणाम मात्र दीर्घकाळ टिकतील. तेव्हा यापुढे निरोगी आयुष्य जगण्यासाठी एका अधिक शाश्वत अशा आचरणाची गरज निर्माण झाली आहे. अनेकांना माहीत नसते की, अन्न शरीरातील आनंदी हार्मोन्सना जन्म देते, ज्यामुळे माणूस मानसिकदृष्ट्या आनंदी राहतो.
अनेक अनुवांशिक कारणांमुळे तुमचा आहार आणि वजन कमी करण्याचे प्रयत्नांनी यांच्यावर परिणाम होऊ शकतो. वजन कमी करू पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीस आपल्याला गाऊट आजार, शरीराला ब जीवनसत्त्व अपु-या प्रमाणात मिळणे, अनुवांशिकतेमुळे बीएमआर कमी असणे, थायरॉइडचा आजार यापैकी एखाद्या गोष्टीचा त्रास असल्याची कल्पना नसेल तर त्याला त्याचे लक्ष्य साध्य करण्यात कधीच यश येणार नाही. आपल्या जनुकीय इतिहासाची माहिती असल्यास तुम्हाला तुमच्या शरीराला साजेशी आहारपद्धती निवडता येईल.
कोणताही विचार न करता प्रवाहपतित होऊन ठराविक साच्यांचे अंधपणे पालन करण्याऐवजी स्वत:चे शरीर, जनुकीय इतिहास याची माहिती करून घेण्याची तुम्हाला खूप मदत होऊ शकेल. आहारावर निर्बंध आणि वारेमाप व्यायाम हा खूपच असमतोल विचार आहे आणि त्यातून मिळणारी आरोग्याची अगदीच त्रोटक आहे. ही व्याख्या बदलण्याची आणि योग्य आहार, सकस आहार घेऊन निरोगी आयुष्य जगण्याची नवी व्याख्या घडविण्याची गरज आहे.
– अमोल नायकवाडी