मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांचा कालमर्यादेत निपटारा होण्यासाठी राज्यात आयोजित केलेल्या ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात 14 लाख 86 हजार 959 तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. दरम्यान, हा सेवा पंधरवडा 5 नोव्हेंबर पर्यंत सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सेवा पंधरवड्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालवधीत दि. 10 सप्टेंबर पर्यंत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत आपले सरकार वेबपोर्टल, महावितरण, डीबीटी, नागरी सेवा केंद्र तसेच विभागांच्या वेबपोर्टलवर एकूण 23 लाख 76 हजार 632 अर्ज प्रलंबित होते. त्यापैकी 14 लाख 86 हजार 959 अर्ज निकाली काढण्यात आले.
नागरिकांच्या सर्वच तक्रार अर्जाचा निपटारा करण्यासाठी या सेवा पंधरवड्यास मुदतवाढ देऊन तो दि. 5 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू ठेवण्याबाबत निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. जास्तीत जास्त तक्रार अर्ज निकाली काढून नागरिकांना दिलासा द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.