मुंबई – शिवसेनेतून बंडाळी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करत केली. राज्यभरातील शिवसेनेच्या अनेक आमदारांनी शिंदे गटात उडी घेतली. राज्यातील राजकारण अक्षरशः ढवळून निघाले. दरम्यान अंधेरी पोटनिवडणुकीतून शिंदे गट आणि भाजप यांनी माघार घेतली असली तरी मुंबईसह राज्यातील इतर पालिका निवडणुकांसाठी शिंदे गट आणि भाजप जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान शिंदे सरकारला चार महिने पूर्ण झाले तरीही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराप्रमाणे दुसरा मंत्रिमंडळ विस्तार देखील लांबवीला जात आहे. पहिल्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील ज्या आमदारांना संधी मिळली नाही त्यांचा हिरमोड झाला. या आमदारांना दुसऱ्या मंत्रिमंडळात संधी मिळते का ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण 20 मंत्री आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्वाधिक खाती आहेत. तर 9 शिंदे गटाचे आणि 9 भाजपाचे मंत्री आहेत. पण दुसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जात आहे. दरम्यान नाराज आमदारांकडे महामंडळांची जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे या आमदारांची नाराजीसुद्धा दूर होईल आणि अध्यक्षपद मिळाल्याने ते कामालाही लागतील, अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
राज्यातील महामंडळांची अध्यक्षपदे ही अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. ठाकरे सरकारनेही महामंडळांवर कोणाच्या नियुक्त्या केल्या गेल्या नव्हत्या. करोनामुळेही या नियुक्त्या रखडल्या होत्या. दरम्यान या सगळ्यावर मुखमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा येत्या काही दिवसांत महामंडळ नियुक्त्यांवर लवकरच निर्णय निर्णय होईल, असे सांगितले होते.