पुणे – पावसाळ्याच्या तोंडावर महापालिकेकडून शहरातील पावसाळी जलवाहिन्यांची तसेच चेंबरची स्वच्छता करण्यात येत आहे. मात्र, ही स्वच्छता करताना चेंबरमधून काढलेला गाळ, घाण रस्त्यावरच ठेवली जात आहे. प्रत्यक्षात, हा गाळ काढल्यानंतर तो तातडीने उचलने बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदारांकडून तो जाणीवपूर्वक तसाच ठेवला जात आहे. रस्त्यावर गाळ ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतर्गत या निविदा काढलेल्या आहेत. त्यामुळे, शहरात अनेक ठिकाणी गाळ रस्त्यावरच पडून आहे.
पैसे वाचविण्याचा घाट…
चेंबरमधून काढण्यात आलेला हा गाळ, घाण अनेकदा ओला असतो. त्यामुळे त्याचे वजन जादा भरते. परिणामी, ठेकेदाराला हा गाळ उचलून नेण्यासाठी गाड्यांच्या जादा फेऱ्या कराव्या लागतात. मात्र, हाच गाळ कडक उन्हामुळे सुकल्यानंतर त्याची माती होऊन त्याचे वजन कमी होते तसेच जास्त वाहतूक करावी लागत नाही. गाळ सुकल्यानंतर त्याची माती वाऱ्याने उडून जाते अथवा त्या गाळावरून पुन्हा वाहने गेल्यास अथवा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी झाडणकाम केल्यास गाळ पुन्हा चेंबरमध्ये जातो. त्यामुळे, ठेकेदारांचा गाळ उचलण्याचा खर्चही वाचतो.
देखरेखेची जबाबदारी कोणाची?
महापालिकेकडून चेंबरच्या सफाईचे काम दिल्यानंतर ठेकेदाराने गाळ काढल्याचे, नंतर तो उचलण्यात आल्याचे फोटो देणे बंधनकारक आहे. या शिवाय, या कामाचे जीपीएस ट्रॅकिंग ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे, ठेकेदार काम करत असल्याचा विश्वास ठेऊन क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात सुरू असल्याचे या कामांची कोणतीही पाहणी केली जात नाही.
मात्र, त्याच वेळी ठेकेदार सादर करतील त्या बिलांवर मात्र अधिकारी तातडीने सह्या करतात. त्यामुळे अशा प्रकारे गाळ रस्त्यावर ठेऊन त्याची माती होण्याची वाट पाहणाऱ्यांवर कारवाईची आणि नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित केला जात आहे.