खालापूर, (वार्ताहर) – गेल्या काही दिवसांपासून खालापूर तालुक्यासह सर्वत्रच तापमानात वाढ झाल्याने नागरिक अक्षरशः हैरण झाले आहेत. उष्मापासून काही काळ सुटका व्हावी, शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी नागरिक थंड पेय व ताडगोळ्यांकडे वळवत आहेत. ताडगोळे उष्णतेच्या वेळेत शरीरासाठी चांगले आसल्याने ताडगोळ्यांना मागणी वाढली असून स्थानिक आदिवासी बांधवांचा व आलिबाग येथून येणाऱ्या व्यापाऱ्यांना उदरनिर्वाहाचे साधन निर्माण झाले आहे.
गेल्या वर्षापेक्षा यंदा तापमानाचा पारा वाढल्याने नागरिकांच्या अंगाची लाही-लाही होत असून दुपारच्या वेळेत अधिक उष्णता निर्माण होत असल्याने वर्दळीचे मुख्य रस्ते ओस पडल्याचे चित्र आहे.
मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने ग्रामीण भागातील स्थानिक आदिवासी बांधव पूर्वपार ताडगोळा विक्रीचा व्यायसाय करीत आहेत. खालापूर ग्रामीण भागासह अन्य बाहेरील शहरातून ताडगोळ्यांचे घडे विकत घेवून हे विक्रीसाठी खोपोली व खालापूर गाठत आसल्याने आदिवासी बांधवांच्या हातचा व्यावसाय बनला आहे.
ताडगोळा उष्णतेच्या काळात शरीरात थंडावा निर्माण करीत असून हे फळ पौष्टिक असल्याने बाजारात आधिक मागणी आहे. एक ताडगोळा फळ ३० ते ४० रूपयांना विकले जात असून हा व्यवसाय तेजी आहेत. त्यामुळे उष्मापासून काही काळ शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी ताडगोळ्याला मागणी वाढली आहे.