आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर दत्ता गांजाळे यांचा निर्णय
मंचर- करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे, यासाठी मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मुक्काम ठोकला आहे. ग्रामपंचायत कार्यालयातून ते सर्वांशी मोबाइलद्वारे संवाद साधून नागरिकांना अत्यावश्यक सेवेबाबत भेडसावणाऱ्या अडचणी दूर करीत आहेत.
आंबेगाव तालुक्यात मंचर शहर सर्वांत मोठे शहर असून, व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. गेल्या आठवड्यापासून लॉकडाऊन झाल्यामुळे मंचर शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित मिळाव्यात, म्हणुन सरपंच दत्ता गांजाळे आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी समन्वयाने काम करत किराणाभुसार, दूध, औषधे घरपोच देण्यासाठी 30 तरुणांचे पथक तयार करून गावातील नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी करू नये, यासाठी घरपोच अत्यावश्यक वस्तू देण्याची सोय केली आहे, तसेच कोणत्याही दुकानदाराने अधिक दराने पैसे घेऊ नयेत आणि घेतल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा सरपंच दत्ता गांजाळे यांनी दिला आहे.
गुरुवार (दि. 26) पासुन मंचर ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दत्ता गांजाळे हे मुक्कामी आले आहेत. त्यांचे कुटुंबिय छत्रपती संभाजी महाराज चौकात राहत आहेत. नागरिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मला वार्डनिहाय जावे लागते, त्यामुळे नागरिकांचा माझ्याशी संपर्क होतो.त्यासाठी मी घरी न जाता कोरोना हद्दपार होईपर्यंत मंचर ग्रामपंचायतीत मुक्कामी थांबणार आहे.गॅसवर स्वयंपाक, झोपण्यासाठी चादर, इतर आवश्यक वस्तू मी माझ्या स्वखर्चाने आणल्या आहेत. तसेच पहाटे साडेसहा ते रात्री दोन वाजेपर्यंत नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी कामकाजाची वेळ वाढवली आहे. येथून आपत्ती व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येते. गावची जबाबदारी असल्यामुळे मी कुटुंबापासून 20 दिवस वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे, असे सरपंच दत्ता गांजाळे यांनी सांगितले.