बावडा -इंदापूर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच नदीतील पाणी चारी बाजूंनी वेढले आहे. परंतु ते पाणी पिता येत नाही. तालुक्याच्या दोन्ही बाजूंनी नीरा व भीमा नद्यांनी अक्राळ- विक्राळ रूप धारण केले आहे. पण नदीकाठावरील सर्वच गावांत पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. त्यामुळे तालुक्याच्या या परिस्थितीला नेमके जबाबदार कोण, असा संतप्त सवाल जनता विचारत आहे. इंदापूर तालुक्यात प्रथमच दुष्काळ, सुकाळाच्या छटा उमटल्या आहेत. तालुक्यातील पाझर तलाव, ओढे, नाले कोरडे ठाक पडले असताना नेतेमंडळी पूरपरिस्थितीचा दिखावा करीत आहेत. यावर उपाय करण्याची तसदी राजकर्त्यांकडून घेत जात नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
इंदापूर तालुक्यात एक काळ असा होता की, पाऊस नाही पडला तरी पाझर तलावातील पाणी वर्षभर हटत नव्हते. कालांतराने तालुक्याची ही जुनी ओळख पुसली गेली. तालुक्यात केवळ जलसंधारणाच्या कामांचे नियोजन झाले नाही. राजकारण, भ्रष्टाचार आणि फोटोबाजीशिवाय काहीच झाले नाही. वास्तविक सहा वर्षांपासून पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.
जनता त्रस्त; नेते मस्त
इंदापूर तालुक्यातील भयानक दुष्काळ प्रत्येक नागरिकांना हैराण करीत आहे. दुष्काळामुळे शेतीला पाणी नाही. जनावरांना चारा नाही. चारा छावणीचा मुक्काम वाढला आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. हाताला काम नाही, अर्थकारणाची चाके रुतली आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. यावर मात्र कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे जनताही त्रस्त झाली आहे. त्यात नेते आता विधानसभेच्या तयारीत दौरेबाजी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.