परवा नेहमीप्रमाणे श्रावणीचे होमवर्क घेत होते. रोज संध्याकाळी तिचे होमवर्क घेणे हा माझा नित्याचा दिनक्रम आहे. होमवर्क करून घेता घेता तिच्याशी गप्पा गोष्टीही होतात. श्रावणी आता तिसरीत आहे, पण अतिशय व्यवस्थित आहे. तिच्या शाळेच्या वह्या बघताना मला मी शाळेत असतानाच्या माझ्या वह्यांची आठवण अनेकदा येते. श्रावणीच्या वह्या आणि पुस्तकेही अतिशय व्यवस्थित, टापटीप ठेवलेली आहेत. आणि वर्ष संपेपर्यंत तशीच नीटनेटकी असतात. खरं तर आजकाल विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम फार मोठा आणि आपल्याला कठीण वाटावा असा असतो. मात्र त्यांची वह्यापुस्तके आणि सर्व साहित्य अगदी व्यवस्थित ठेवलेले दिसते. होमवर्कही अगदी वेळच्या वेळी करतात ते. जवळपास सर्वांचेच अक्षर अगदी सुबक, सुवाच्य असते.
मला आठवते, आमच्या वेळी मात्र इतका नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा नव्हता. आमच्या घरी आमचे होमवर्क कोणी कोणी विचारल्याचेही आठवत नाही, मग ते रोजच्या रोज घेण्याची गोष्ट दूरच.
शाळेत असताना आमच्या वह्यांमध्ये रफ वही नावाचा एक प्रकार असायचा. त्या वहीत काय नसायचे? सारे काही असायचे. वर्गातील अभ्यास, चित्रे, रांगोळ्या, गाणी… कोडी आणि वेडेवाकडे फराटे… सारं काही त्या वहीत कोंबलेले असायचे. एक वेळ एखाद्या विषयाची वही जवळ नसली तरी चालेल, पण ही रफ वही मात्र जवळ हवीच. आणि ही वही चांगली जाडजूड-खूप पानांची असायची. मागील वर्षांच्या जुन्या वह्यांमधील कोरे कागद काढून बायंडिंग करून ही केलेली असायची. इतका सारा फाफटपसारा भरूनही वर्ष संपेपर्यंत तिच्यात नेहमी कोरी पाने असायचीच. ती बघताना वेळ कसा जायचा ते कळतही नसे.
ती वहीच असली तरी नेहमीची साधीसुधी केवळ अभ्यासाची वही नसायची, तर आठवणींची वही असायची. अभ्यासाबरोबरच असंख्य गोष्टी या वहीत नोंदल्या जायच्या. अगदी बालपणीच्या अल्लड-अवखळ आठवणी. शाळेत पहिले पाऊल टाकले तेव्हाच्या नव्या नवलाईच्या आठवणी आणि पुढे वाढत्या वयाच्या समजूत येतानाच्या फुलणाऱ्या… किती किती प्रकारच्या आठवणी त्या रफ वहीत असायच्या, वहीच्या पानापानावर. त्यातील अक्षर कधी गिचमिड असली, तरी शब्द मात्र निर्व्याज, तर कधी अवखळ-चंचल असत. बाकीच्या वह्या रद्दीत गेल्या, तरी रफ वह्या मात्र वर्षानुवर्षे ठेवल्या जात. कधी त्या जुन्या वह्या बघताना माझ्याशी हितगूज करत. मला खुणावत. माझ्याबरोबर नाचत, बागडत, कधी हळव्या होत. कधी बालपणीच्या आठवणींनी डोळ्यांना अश्रूंचा पूरही आणत. त्या वह्या नंतर फार उशिरा रद्दीत गेल्या, तरी आठवणीत मात्र तशाच आहेत. आता मोठेपणी कधी खूप ताण जाणवला, कंटाळा आला, की मी मनाच्या कोपऱ्यातील या रफ वहीचे एखादे पान उघडते आणि त्यात हरवून जाते. ते जुने निरागस क्षण पुन्हा अनुभवते. सारा ताण निघून जातो.
किती तरी प्रकारचे संवादाचे सूर पकडतात ही पाने. बोलू लागली की नुसते चिवचिवत राहतात. आठवणींचे टपोरे थेंब मनाला चिंब करू लागतात. एक कोवळी निरागस मैफल एखाद्या उबदार शालीप्रमाणे मायेत लपेटून टाकते.
जिवापाड मैत्रीच्या शालेय जीवनातील आठवणींची पाने खूप काही शिकवून जातात. हातातून निसटून गेलेले ते वय आठवणीतील वहीच्या रूपाने पुन्हा सोबत करू लागते. इतर कोणाशीही बोलता न येणारे अगदी काळजातले विचार या वहीच्या पानापानांत जपलेले असायचे. त्यात ठेवलेली ती मोरपिसे, वाळलेली पिंपळपाने, चॉकलेटच्या रंगीबेरंगी चांद्या, दसऱ्याचे लुटलेले सोने… आणखी खूप काही. ही रफ वही म्हणजे आठवणींचा एक अल्बम, आयुष्याचा एक अनमोल ठेवा असतो. “गुजरा हुआ जमाना’ म्हणत बालपणीचा सुखाचा काळ आठवत हळवे होण्यात मोठा आनंद असतो.
तुम्हीही आठवण करून पाहा, शालेय जीवनातील एखादी रफ वही तुम्हालाही सापडेल आणि तिच्यात एक अनमोल खजिनाही सापडेल.
योगिता जगदाळे