नवी दिल्ली: जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील सध्याची करोना रुग्णांची संख्या ही चिंताजनक नाही. परंतु देशातील लॉकडाउन शिथिल केल्यानंतर करोनाचा समूह संसर्ग होण्याचा धोका असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
या संदर्भातील एक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काही तज्ज्ञांनी भारतामध्ये समूह संसर्गाला सुरुवात झाल्याचे मत व्यक्त केले आहे. पब्लिक हेल्थ फेड्रेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्राध्यापक के. श्रीनाथ रेड्डी हे समूह संसर्गाची व्याख्या काय आहे त्यावर भारतात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे की नाही हे सांगता येईल, असे म्हटले आहे. रेड्डी म्हणाले, भारतामध्ये आता असे अनेक रुग्ण आहेत जे परदेशात जाऊन आलेले नाहीत किंवा जे थेट कोणत्याही करोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आले नाहीत. तरी त्यांना करोनाचा लागण झाली आहे.
असं असलं तरी भारतातील अनेक प्रकरण ही परदेशावारी करुन आलेल्यांशी संबंधित किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या माध्यामातून संसर्ग झालेली आहेत. त्यामुळे जे लोकं सध्या देशामध्ये दुसरा टप्पा म्हणजे स्थानिक प्रसार (लोकल ट्रान्समिशन) सुरु असल्याचे सांगत आहेत त्यांना संसर्ग झालेल्यांचा शोध घेता येईल, असे म्हणायचे आहे. समाजामधील कोणत्या व्यक्तीला संसर्ग झाला हे शोधून काढणे अजून शक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळेच आपण कम्युनिटी ट्रान्समिशन हा शब्द प्रयोग वापरत नसून हा केवळ व्याखेसंदर्भातील मुद्दा आहे. यासंदर्भात आपल्याकडे फारशी चर्चा झालेली नाही, असे रेड्डी यांनी सांगितले.
ज्या-ज्या देशामध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला त्या देशांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भारतानेही यासाठी पूर्णपणे सज्ज राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. करोनाचा संसर्ग अधिक वाढणार नाही यासंदर्भात सर्व त्या उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक निर्णय घेणे गरजेचे असल्याचेही रेड्डी यांनी म्हटले आहे. रेड्डी हे एम्समधील कार्डीओलॉजी विभागाचे प्रमुख होते.