सोल – जगभरासह भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज ३० हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने देशवासीयांची चिंता चांगलीच वाढलीये. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे देशातील काही राज्यांनी पुन्हा एकदा लॉक डाऊनचा पर्याय निवडला असला तरी यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होताना दिसत नाहीये.
अशातच दक्षिण कोरियाच्या महासाथ तज्ज्ञांनी कोरोना बाधेबाबत एक संशोधन केलं आहे. या संशोधनानुसार कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्णांना कोरोना संसर्ग आपल्याच कुटूंबातील व्यक्तींकडून झाल्याचं निदर्शनास आलं आहे.
याबाबतचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसच्या संकेतस्थळावर वृत्तसंस्थेच्या हवाल्याने देण्यात आलंय. याबाबतचं संशोधन यु.एस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (रोग नियंत्रण आणि प्रतिबंध) मध्ये प्रसिद्ध करण्यात आलं असून यामध्ये प्रत्येक दहा व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कोरोनाची बाधा कुटुंबातील सदस्याकडून झाल्याचा निष्कर्ष मांडण्यात आलाय.
कोरोनाबाधा झालेल्या १०० रुग्णांपैकी केवळ २ रुग्णांना कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींकडून विषाणू संक्रमित झाल्याचे देखील आढळले आहे. या संशोधनाचा निष्कर्ष ५,७०६ मूळ कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कात आलेल्या ५९,००० लोकांच्या अभ्यासातून काढण्यात आला आहे.
या अभ्यासामधील प्रमुख वैज्ञानिक जिओंग ऐन-क्योंग यांनी याबाबत बोलताना, “कुटुंबातील व्यक्तींकडून संक्रमण होण्याचे प्रमाण बालके व ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांमध्ये जास्त असल्याचं आढळून आलंय. याचे एक कारण असेही असू शकते की या वयोगटातील लोक कुटुंबातील इतर व्यक्तींच्या संपर्कात अधिक येत असतात.”
दरम्यान, हे संशोधन १६ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून या अभ्यासातील सर्वेक्षण जानेवारी २० ते मार्च २७ दरम्यान करण्यात आलं होत. याच कालावधीत दक्षिण कोरियात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आढळून येत होते.