प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 25 -करोना काळातील ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढणे आणि विद्यार्थ्यांचा दर्जा उंचावणे हे आव्हानात्मक आहे. त्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 1 सप्टेंबरपासून ज्ञानसुधार उपचारात्मक उपक्रम योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून आधीच्या वर्षातील संकल्पनांची उजळणी होईल आणि नवीन शैक्षणिक वर्षातील नव्या संकल्पनांचे आकलन होणे शक्य होणार आहे.
करोना काळात अध्ययन-अध्यापन प्रक्रिया ऑनलाइन झाली. अध्यापकांचा विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संकल्पनांविषयी पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे अपेक्षित अध्ययन निश्चित झाली नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीवर झाला. आता शैक्षणिक कामकाज पूर्वपदावर येत असताना आणि नवीन शैक्षणिक वर्षाचा अभ्यासक्रम सुरू होत असताना विद्यार्थ्यांना आधीच्या वर्गातील संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक आहे. अन्यथा नव्या संकल्पनांचे आकलन होणार नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांची आधीच्या वर्गातील संकल्पनांची उजळणी होणे आवश्यक आहे. त्यासाठी उपचारात्मक अभ्यासक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली.
असा असेल उपक्रम
उपचारात्मक उपक्रमांतर्गत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या आकलन स्तराची निश्चिती करण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून देण्यासाठी दहा ते वीस तासांचा उपचारात्मक कार्यक्रम राबवला जाईल. अभ्यासक्रम संपल्यावर उत्तर चाचणी घेऊन आकलन स्तर उंचावल्याची खात्री करून घेतली जाईल. त्यातही काही विद्यार्थ्यांचे आकलन पुरेसे झाले नसल्यास त्यांच्यासाठी पुन्हा विशेष बाब म्हणून अभ्यासक्रम राबवण्यात येणार आहे.