मुंबई – कर्नाटकमधील सरकार कोसळल्यानंतर आता मुंबईत मुक्काम ठोकून असणाऱ्या बंडखोर आमदारांना भाजप नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची प्रतीक्षा आहे. येडियुरप्पा यांच्या शपथविधीनंतरच ते मुंबई सोडून बंगळूरमध्ये दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले.
चालू महिन्याच्या प्रारंभापासून कॉंग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर आमदार मुंबईतील लक्झरी हॉटेलमध्ये राहत आहेत. बंडखोर आमदारांना हवे ते मिळाले आहे. कॉंग्रेस-जेडीएस आघाडी सरकार कोसळल्याने ते आनंदी आहेत, अशी माहिती भाजपच्या सुत्रांनी दिली. संबंधित बंडखोर आमदारांमुळेच कर्नाटकमधील आघाडी सरकार अडचणीत आले.
मात्र, त्यांनी राजीनामा देण्यामागे आणि सरकारचा पाठिंबा काढून घेण्यामागे भाजपचा हात नसल्याची भूमिका सुरूवातीपासूनच घेतली. आता बंगळूरला परतण्याबाबतची भूमिका स्पष्ट करून त्यांनी कर्नाटकमधील सरकार स्थापनेसाठी भाजपला मदत करणार असल्याचेच एकप्रकारे सूतोवाच केले.