नवी दिल्ली -भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा याला दुखापत झाल्यामुळे आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषित केलेल्या तीनही संघात स्थान देण्यात आलेले नाही. मात्र, बीसीसीआयच्या निवड समितीच्या या निर्णयावर अनेक वरिष्ठ क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. रोहितला वगळण्याचे खरे कारण किंवा वस्तुस्थिती सर्वांना समजलीच पाहिजे, असा सूर या खेळाडूंनी लावला आहे.
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत रोहितला पायाचे स्नायू दुखावल्यामुळे गेल्या दोन सामन्यांत खेळता आलेले नाही. त्याची दुखापत जर गंभीर नाही असे मुंबई इंडियन्सचे व्यवस्थापन म्हणत असेल तर तर याबाबत आणखी सुस्पष्टता आली पाहिजे. त्याला काय झाले आहे किंवा दुखापतीचे स्वरूप कसे आहे.
तो थेट ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीनही मालिकांत खेळू शकणार नसेल तर तो आयपीएलमधील उर्वरित सामने खेळणार आहे का, याबाबत संघ व्यवस्थापनाने, बीसीसीआयने तसेच निवड समितीने सर्वकाही स्पष्ट सांगयला हवे, अशा शब्दांत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी कान टोचले आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये डाव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा गेले दोन सामने खेळू शकलेला नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ जाहीर करताना त्याला वगळण्यात आल्याने अनेक चर्चांना उत आला आहे. त्यातच मयंक आग्रवाललाही दुखापत झालेली असताना त्याचा संघात समावेश झाला आहे. मात्र, रोहितला वगळण्यात आले याबाबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.