कृषी अधिकारी सपना ठाकूर ः ऑक्टोबरच्या नुकसानीचे आकडे येणे बाकी
उरुळी कांचन- पूर्व हवेलीत परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानामुळे भाजीपाला (तरकारी) पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीच्या आकडेवारीमुळे शेतकऱ्यांचे अर्थिक गणित बिघडले आहे. यात कांदा, भाजीपाला, फुले, ऊस या पिकांना मोठा फटका बसल्याचे महसूल व कृषी विभागाने संयुक्तपणे केलेल्या पंचनाम्यावरून दिसून येत आहे.
जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 पर्यंतच हवेलीमध्ये 3100 हेक्टर म्हणजेच 7750 एकर शेतपिकाला अतिवृष्टीचा तडाखा बसला होता; परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस भयानक झाला त्याची आकडेवारी यायची बाकी असल्याची माहिती हवेलीच्या तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर यांनी दिली.
हवेलीतील लोणी काळभोर व कदमवाक वस्ती येथील अंदाजे 450 हेक्टर (1125 एकर) शेतातील 800 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तेथील शेतकऱ्यांचे पंचनामे गावकामगार तलाठी दादासाहेब झंजे, कृषी सहाय्यक मुक्ता गर्जे,ग्रामसेवक एल. के. पवार हे करत आहेत.
मौजे तरडे (ता. हवेली) येथील 193.9 हेक्टर क्षेत्राला तडाखा बसला असून, 383 शेतकरी बाधित झाले आहेत, तर वळती येथील 79.6 हेक्टर क्षेत्रात 157 शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, फुलशेती व भाजीपाला शेतीला फटका बसल्याची माहिती कृषी सहाय्यक बालाजी पाटील यांनी दिली.
ऊरुळी कांचन सर्कलमध्ये तलाठी प्रदीप जवळकर, कोतवाल, कृषी सहाय्यक शेतपिकांची पाहणी करत असून, नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू असल्याची माहिती मंडलाधिकारी दीपक चव्हाण यांनी दिली.
पेठ, नायगाव व सोरतापवाडी या गावांमध्ये 151 हेक्टर भाजीपाला क्षेत्राला अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने 386 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अजूनही काही ठिकाणी पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती तलाठी निवृत्ती गवारी यांनी दिली.
- भाजीपाल्याला मोठा फटका
लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, आळंदी म्हातोबाची, तरडे, वळती, कोरेगाव मूळ, अष्टापूर, भवरापूर, हिंगणगाव, शिंदवणे व उरुळी कांचन, पेठ, सोरतापवाडी, नायगाव या गावांना अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. हवेलीतील शेतकऱ्यांनी उसाचे पीक कमी करून भाजीपाल्याकडे लक्ष वळवले आहे, त्यामुळे या नाशवंत भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. - सुटीच्या दिवशीही पंचनामे सुरू
जिल्हा अधिकारी नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार शासकीय सुटीच्या दिवशीही पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील तलाठी, कोतवाल, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांचे पथक शेतकऱ्यांच्या बांधावर दिसून येत आहेत.