पुणे- मराठा आरक्षणाला स्थगिती मिळताच पाडव्याचा मुहुर्त काढावा त्याप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) परिक्षांचे मुहुर्त काढले. करोनाचा संसर्ग असताना विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी या परिक्षा रद्द करून पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली. दोन दिवसांत निर्णय घ्यावा अन्यथा शुक्रवादी (दि.9) मुंबई येथील एमपीएससी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही मेटे यांनी दिला.
मराठा विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी आयोजीत पत्रकार परिषदेत मेटे बोलत होते. यावेळी अनुप देशमुख, परम बिराजदार, अर्चना पाटील, विक्रम गायकवाड, पूजा झोळे उपस्थित होते. लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठी जवळपास 26 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये दहा ते बारा लाख विद्यार्थी हे मराठा समाजाचे आहेत.
त्यामुळे ही परिक्षा या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची आहे. परंतु, अनेक विद्यार्थी क्वारंटाइन आहेत, तर काहींना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या परिक्षा रद्द करून त्या पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी सरकारकडे केली जात आहे. मात्र, हे सरकार लोकसेवा आयोगाच्या मार्फत विद्यार्थ्यांना न्याय देण्याऐवजी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. या विद्यार्थ्यांना निराधार करण्याचे काम लोकसेवा आयोग आणि शासन करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला.
नुकतीच युपीएससीची परिक्षा झाली. त्या परिक्षेलाही करोनामुळे 30 ते 40 टक्के विद्यार्थी अनुपस्थितीत होते. हा अनुभव समोर असताना विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परिक्षा पुढे ढकलणे योग्य आहे. मात्र, परिक्षा घेण्याबाबत आयोगाकडून एवढा अट्टाहास कशासाठी, नक्की यामागचा उद्देश काय? असा प्रश्न मेटे यांनी उपस्थित केला आहे.