माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ः “शिवामृत’ येथे सहकार महर्षींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण
एम. एम. शेख
अकलूज – सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर कसलेही आरोप करू देत, या आरोपांना व धमक्यांना आम्ही घाबरत नाही. जनतेला आमचा कारभार माहीत आहे, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या 102 व्या जयंतीनिमित्त आयोजित जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. विजयनगर-विझोरी (ता. अकलूज) येथील “शिवामृत’ येथे कै. शंकरराव मोहिते पाटील यांच्या अर्ध पुतळ्याचे आणि सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर अकलूज येथे रविवारी (दि. 12) उपस्थित होते. यानंतर गांधी चौकात अकलूज ग्रामपंचायतीतर्फे या सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विजय चौक येथील शेतकरी मेळाव्यास ते उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रात दुष्काळ मुक्तीसाठी सामुहिक जल संधारण किती गरजेचे आहे, हे नाला खोलीकरण करताना लक्षात आले. आता दुष्काळ मुक्तीसाठी पाणी अडवल्याशिवाय पर्याय नाही. मोदी सरकारने साखर 31 रुपये दर निश्चित केल्यामुळेच साखर उद्योग वाचला आहे, आणि त्यामुळेच साखर कारखान्यांना एफआरपी देणे शक्य झाले.
यावेळी माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रस्तावना करताना दिल्लीत कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी प्रयत्न करावे लागतील, असे सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहित पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, माजी रणजितसिंह मोहिते पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार राम सातपुते, आमदार जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक रविराज इनामदार, राजेंद्र यादव, विविध संस्थाचे पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते.