नवी दिल्ली – खरिपाच्या पेरणीचा कालावधी संपुष्टात आला तरी भारतातील विविध राज्यांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी क्षेत्रफळावर तांदळाची लावणी झाली आहे. त्यामुळे यावर्षी तांदळाचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
या कारणामुळे अगोदरच देशांमध्ये तांदळाच्या किमती काही प्रमाणात वाढत आहेत. सरकारचे या घडामोडीकडे बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात येते. कृषी मंत्रालयाने आज या संदर्भात उपलब्ध केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत गेल्या वर्षाच्या तुलनेत तांदळाचे क्षेत्रफळ 5.62 टक्क्यांनी कमी होऊन 383.99 लाख हेक्टर इतके झाले आहे.
बऱ्याच राज्यामध्ये पाऊस उशिरा आला आहे किंवा कमी आला आहे. त्यामुळे तांदळाच्या लागवडीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येते. झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यामध्ये तांदळाची अपेक्षा पेक्षा कमी लागवड झाली आहे. ओरिसा, आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, पंजाब, जम्मू-काश्मीर, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यात तांदळाची लागवड बऱ्यापैकी झाली आहे. डाळींच्या पिकांचे क्षेत्रफळ कमी होऊन 129 लाख हेक्टर झाले आहे. गेल्या वर्षी 135 लाख हेक्टरवर डाळींच्या पिकाची पेरणी झाली होती. तुर, उडीद पेरणीचे क्षेत्र बरेच कमी झाले आहे.
याशिवाय आणखी चिंतेची बाब म्हणजे तेलबियाचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. कापसाची लागवड वाढली आहे. तर जूटची लागवड गेल्या वर्षी इतकी झाली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार देशांमध्ये सहा टक्के जास्त पाऊस पडला असला तरी उत्तर -पूर्वेकडील काही राज्यांमध्ये तो कमालीचा विषम प्रमाणात पडलेला आहे.