नवी दिल्ली – आम्ही मणिपूरमधून जेडीयु पक्ष संपवला आहे, आता आम्ही बिहारमधील राजद-जेडीयु महागठबंधन तोडू असे प्रतिप्रादन भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केले आहे.
काल जेडीयु पक्षाचे मणिपूर मधील सहा पैकी पाच आमदार भाजपने फोडले. हे आमदार आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. जेडीयु पक्षाला राजकीय धक्का देण्यासाठी भाजपकडून ही खेळी केली गेली आहे.
या संबंधात सुशीलकुमार मोदींनी म्हटले आहे की बिहारमध्येही जेडीयु-राजद यांच्यातील युतीही आता आम्ही तोडू. या आधीही अरूणाचल प्रदेशातील जेडीयुचा एकमेव आमदार भाजपने फोडला होता. तेथील काही जेडीयु नगरसेवकही भाजपने फोडले आहेत.
बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपची संगत तोडून राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करून तेथे सरकार स्थापन केल्याने भाजपमध्ये मोठीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचा वचपा त्यांनी मणिपूरमधील जेडीयु पक्ष फोडून काढल्याचे सांगितले जात आहे.